31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयअदानी, अंबानीवरून मोदी-गांधींमध्ये सामना

अदानी, अंबानीवरून मोदी-गांधींमध्ये सामना

कॉंग्रेसने घेतले पैसे, राहुल गांधींनी दिले चौकशीचे आव्हान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसने उद्योगपती अदानी आणि अंबानी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात काळा पैसा गोळा केला असून हे पैसे घेतल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर टीका करणे बंद केले आहे, असा गंभीर आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार दुस-या दिशेला नेला. कधीही अदानी-अंबानींवर न बोलणा-या मोदींनी थेट प्रचारसभेत या उद्योगपतींची नावे घेऊन सगळ््यांना आश्चर्याचा धक्का दिला. यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आता घाबरले आहेत का, एरव्ही बंद खोलीत चर्चा होत असताना अदानी-अंबानींची जाहीररित्या नावे घेतली जात आहेत. तसे असेल तर सीबीआय, ईडीला त्यांच्याकडे पाठवून चौकशी करावी, असे आव्हान दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानी आणि अंबानींची नावे बंद खोलीत घेत होते. आता पहिल्यांदाच त्यांनी अदानी आणि अंबानी यांची नावे जाहीररित्या घेतली आहेत. ते टेम्पोमधून पैसे देतात, तुम्हाला कसे काय माहीत, तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला असून, यासंदर्भात सीबीआय आणि ईडीला अदानी आणि अंबानींकडे पाठवून न घाबरता त्यांची संपूर्ण चौकशी करा, असे आव्हान दिले. मी देशाला सांगू इच्छितो की, नरेंद्र मोदींनी जेवढा पैसा या दोघांना दिला, तेवढाच पैसा आम्ही भारतातल्या गरीब लोकांना देणार आहोत. महालक्ष्मी योजना, पहिली नोकरी पक्की योजना या आणि अशा योजनांच्या माध्यमातून करोडो लोकांना आम्ही लखपती बनवू, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.

तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षे काँग्रेसचे राजकुमार अदानी आणि अंबानी यांच्यावर आरोप करत होते. मात्र निवडणूक जाहीर होताच अचानक त्यांनी अदानी, अंबानींवर बोलणे बंद केले. दोन्ही उद्योगपतींकडून त्यांना किती बॅगा भरून काळा पैसा मिळाला, अदानी-अंबानी आणि राहुल गांधी यांच्यात अशी कोणती डील झाली, ज्यामुळे आता एका रात्रीत राहुल गांधी यांचा दृष्टीकोन बदलला, असा सवाल करून मोदींनी राहुल यांच्यावर टीका केली होती, त्याला राहुल गांधी यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR