राजकोट : वृत्तसंस्था
राजकोटमधील वेजा गाव सध्या अशा एका विचित्र आणि गंभीर समस्येचा सामना करत आहे, जे ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. गावात डासांचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की, आता रात्रीच्या वेळी लोकांना गावात राहणे खूप कठीण झाले आहे. वेजा गावातून वाहणा-या नदीमध्ये जलपर्णीचे साम्राज्य इतके पसरले आहे की, संपूर्ण नदीत फक्त जलपर्णीच दिसत आहे. जलपर्णी पसरण्याचे मुख्य कारण म्हणजे साचलेली घाण आणि प्रदूषित पाणी.
जलपर्णी डासांच्या उत्पत्तीसाठी अत्यंत पोषक ठरत आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर डास होत आहेत. दिवसा हे डास जलपर्णीमध्ये लपून राहतात आणि रात्र होताच बाहेर पडून गावात शिरतात. डासांची संख्या कोटींच्या घरात असेल असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण डासांचे थवेच्या थवे गावावर आक्रमण करतात. धक्कादायक बाब म्हणजे डासांच्या त्रासामुळे गावातील मुलांची लग्नं देखील होत नाहीत. लग्नासाठी कोणीही मुलगी देत नाही.
या गावाची भौगोलिक स्थितीही प्रशासकीय अडथळ्याचे कारण ठरत आहे. अर्धे गाव राजकोट महानगरपालिकेच्या अंतर्गत येते, तर अर्धे गाव फवऊअ (राजकोट अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी) च्या हद्दीत येते. उपसरपंचांनी सांगितले की, त्यांनी दोन्ही ठिकाणी तक्रारी केल्या आहेत, परंतु दोन्ही संस्था जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. उपसरपंचांनी असा इशाराही दिला आहे की, जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर यापुढेही गावातील तरुणांना लग्नासाठी कोणीही मुलगी देणार नाही.
डासांच्या त्रासामुळे गावात रात्र काढणे अशक्य
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जर एखादा पाहुणा किंवा नातेवाईक गावात आला, तर तो संध्याकाळ होताच परत निघून जातो, कारण बाहेरील व्यक्तीला या डासांच्या त्रासामुळे गावात रात्र काढणे अशक्य आहे. डासांची संख्या एवढी जास्त आहे की, गावातील रस्त्यांवरून चालताना ते तोंड, नाक आणि कानातही शिरतात. या परिस्थितीमुळे ग्रामस्थ स्वत:ला हतबल मानत आहेत.
डास चावल्यामुळे गुरं आजारी
ग्रामीण भाग असल्याने येथे गुरांची संख्याही मोठी आहे. ग्रामस्थांना आपल्या जनावरांचे डासांपासून रक्षण करण्यासाठी त्यांना मच्छरदाणीत ठेवावे लागत आहे. यासाठी त्यांनी मोठ्या आकाराच्या मच्छरदाण्या तयार केल्या आहेत. डास चावल्यामुळे गुरं आजारी पडत असून त्यांनी दूध देणेही बंद केले आहे, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

