लातूर : प्रतिनिधी
काँग्रेसच्या काळात देशात दररोज नवनवीन घोटाळे होत राहिले. त्यामुळे देश प्रगती करु शकला नाही. परंतू, २०१४ नंतर देशात ‘एनडीए’चे सरकार आले आणि देशात विकासाची प्रक्रिया सुरु झाली. आज देश जगातील नामवंत देशापैकी एक बनला आहे. एनडीए सरकारने सर्वांना न्याय दिला आहे यापुढेही सर्वांना न्याय दिले जाणार, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ दि. ३० एप्रिल रोजी लातूर शहरातील सारोळा रोडवरील मोकळया जागेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार सुधाकर शृंगारे, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची उपस्थिती होती. जी मंडळी पंतप्रधानपदसुद्धा विभागून बनवू इच्छितात ते काय देशाचा विकास करणार, अशा शब्दात काँगे्रेसवर टिका करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, मी एकसंघ भारताचे बोलतो तेव्हा काँग्रेसवाल्यांना ताप येतो. एक-एक करुन देश लुटण्याचा विरोधकांचा उद्देश आहे. २०१४ पुर्वीचा भारत आणि २०१४ नंतरचा भारत याची तुलना नवमतदारांनी करावी. ही तुलना केल्यानंतरच २०१४ नंतर देशात काय बदल झाला हे लक्षात येईल.
२०१४ पूर्वी देशात दररोज कुठेना कुठे बॉबस्फोट व्हायचे, दहशतवादी कारवाईत निष्पाप लोक मरायचे. मात्र २०१४ नंतर हे सगळं बंद झाले. भारतीय खेळाडू ऑलिम्पीकमध्ये सर्वांत पुढे आहेत. येत्या काळात देशात ऑलिंम्पीकच्या स्पर्धा घेण्यात येतील. भाजपामुळे आज देश जगात नंबर एक स्थानावर पोचला आहे. आगामी काळातही देशाचा विकास साधण्यासाठी भाजपाचे सुधाकराव यांना प्रचंड मतांनी विजय करावे, असे आवाहन केले. तत्पुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली.
चुक मुख्यमंत्र्यांची, पंतप्रधान सावध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना त्यांनी सुधाकर शृंगारे यांचा उल्लेख ‘सुधाकर शृंगारपुरे’, असा एक नाही दोनवेळा केला. त्यावेळी नागरीकांनीच शृंगारपुरे नाही शृंगारे, असे ओरडून सांगीतले. परंतू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांनी सुचविलेल्या दुरुस्तीकडे लक्ष न देता आपले भाषण संपवले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणास सुरुवात केली. त्यांनी सुधाकर शृंगारे यांचा उल्लेख केवळ सुधाकरराव असा केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी शृंगारे यांचा उल्लेख शृंगारपुरे केल्याचे एकच हशा पिकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावध होत सुधाकर शृंगारे यांच नामोल्लेख केवळ ‘सुधाकरराव’ असाच केला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चुकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सावध झाले, अशी चर्चा सभास्थळी होती.