माले : मालदीव आणि भारत या दोन देशांमधील तणाव वाढत असताना आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या आहेत. मालदीव आणि भारत यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून चांगले संबंध राहिले आहेत. भारताने नेहमीच छोट्या देशांना मदत केली आहे. ज्यामध्ये मालदीवचा देखील समावेश आहे. पण आता मालदीवमध्ये नवीन सरकार आल्याने त्यांनी भारतासोबतचे संबंध बिघडवले आहेत. कारण सत्तेत आलेले मुइज्जू हे चीन समर्थक आहेत. त्यामुळेच ते भारतापेक्षा चीनला अधिक महत्त्व देत आहेत. त्यातच आता मालदीवचे माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी मुइज्जू सरकारचे आणखी एक खोटे उघड केले आहेत. मालदीवमध्ये हजारो भारतीय सैनिक असल्याचा राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांचा दावा त्यांनी खोडून काढला आहे.
शाहीद म्हणाले की देशात एकही सशस्त्र परदेशी सैनिक तैनात नाहीत. मुइज्जूच्या हे खोटे बोलत आहेत. मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद यांनी सोशल मीडिया साइट (ट्विटर) वर ही पोस्ट शेअर केली आहे. मुइज्जू सरकारने मालदीवमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय सैन्याच्या संख्येबाबत खोटा दावा केला आहे. मालदीवच्या नेत्याने लिहिले की राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी केलेला हजारो भारतीय सैनिकांच्या उपस्थितीबाबतचा दावा खोटा आहे. भारतीय सैनिकांची नेमकी संख्या सांगण्यास मुइज्जू सरकार अस्पष्टपणे बोलत आहेत. देशात एकही सशस्त्र परदेशी सैनिक नाही. पारदर्शकता महत्त्वाची आहे असून सत्य बाहेर आले पाहिजे.
चीन समर्थक आहेत मुइज्जू
मोहम्मद मुइज्जू हे नोव्हेंबर २०२३ मध्ये मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाले. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी मालदीवमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय सैनिकांच्या माघारीचा मुद्दा उपस्थित केला होता. सत्तेवर आल्यास भारतीय सैनिकांना परत पाठवू असे त्यांनी म्हटले होते. पण हे भारतीय सैनिक त्यांच्याच मदतीसाठी तेथे तैनात आहेत हे मुइज्जू विसरले असावेत.
मुइज्जू भारतविरोधी भूमिकेत
राष्ट्राध्यक्ष होताच त्यांनी भारत सरकारला देशातून आपले सैन्य मागे घेण्याची औपचारिक विनंती केली. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मालदीवमधून भारतीय सैन्य मागे घेण्याबाबत भारत सरकारसोबत करार झाला असल्याची घोषणा केली होती. आता ते म्हणाले की, भारतीय सैनिक लवकरच भारतात परतणार आहेत.