मुंबई : मुंबईसह राज्यातील अनेक भागांत बकरी ईदच्या कुर्बानीवरून वातावरण तापले असताना भाजपने सार्वजनिक ठिकाणी होणा-या कुर्बानीला कडाडून विरोध सुरू केला आहे. मीरारोड, घाटकोपर आणि गोरेगाव परिसरात कुर्बानीसाठी आणलेल्या बक-यांवरून गेल्या काही दिवसांत वाद निर्माण झाला आहे.
पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी भारतीय संविधानाचा उल्लेख करत सर्व धर्मांना समान अधिकार असल्याचे स्पष्ट केले. कोणतीही कृती संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊ नये. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाबाबत बोलताना, मुस्लिम हे काही औरंगजेबाची अवलाद नाहीत, ते आपलेच लोक आहेत. भारतात पूर्वी सर्वजण हिंदू होते. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करणारे वातावरण तयार होऊ देऊ नये, असे विधान केले. भाजपसह कोणत्याही पक्षाने समाजात द्वेष पसरवणारी भूमिका घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. रामदास आठवले यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बकरी ईदच्या कुर्बानीविरोधात भाजप आक्रमक भूमिका घेत असताना, आठवलेंनी दिलेला हा सल्ला भाजपसाठी घरचा आहेर मानला जात आहे. भारतीय संविधान सर्वांसाठी समान आहे. धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, असेही आठवले यांनी म्हटले. त्यामुळे आता भाजप नेते यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील वाढत्या धार्मिक वादांच्या पार्श्वभूमीवर आठवलेंच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
















