नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी म्हणाले की नरेंद्र मोदींच्या आरक्षण हटाओ मोहिमेचा मंत्र आहे न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी, म्हणजे सरकारी नोक-या नाहीत, आरक्षण नाही. भाजपा सरकार खासगीकरण करून सरकारी नोक-या काढून दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचे आरक्षण छुप्या पद्धतीने हिसकावून घेत आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. सन २०१३ मध्ये पब्लिक सेक्टरमध्ये १४ लाख कायमस्वरूपी पदं होती, त्यापैकी २०२३ पर्यंत केवळ ८.४ लाख पदे उरली आहेत. बीएसएनएल, सेल, भेल यांसारख्या आघाडीच्या सार्वजनिक उपक्रमांना उद्ध्वस्त करून फक्त पब्लिक सेक्टरमधील जवळपास ६ लाख कायमस्वरूपी नोक-या नष्ट झाल्या आहेत. ही एकमेव पदे आहेत जिथे आरक्षणाचा लाभ मिळतो.
सरकारी कामं कंत्राटावर देऊन रेल्वेसारख्या संस्थेत मागच्या दाराने संपवल्या जाणा-या नोक-यांची गणती नाही. मोदी मॉडेलचे खासगीकरण म्हणजे देशाच्या संसाधनांची लूट होत असून, त्याद्वारे वंचितांचे आरक्षण हिसकावले जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
काँग्रेस पक्षाची गॅरंटी आहे की आम्ही पब्लिक सेक्टर्स मजबूत करू आणि ३० लाख रिक्त सरकारी पदे भरून समाजातील प्रत्येक घटकासाठी रोजगाराची दारे खुली करू. यासोबतच परीक्षा घेण्यापासून ते भरतीपर्यंतची निश्चित कालमर्यादा असेल असे देखील राहुल गांधी यांनी म्हटले आहे.