कळंब : सतीश टोणगे
लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. सर्वच पक्षांनी लहान-मोठ्या सभा, कॉर्नर बैठका घेऊन आपल्या उमेदवाराला का मतदान करायचे हे पटवून सांगितले आहे. मतदारराजांनीही उमेदवारांचे, नेत्यांचे, गाव पुढा-यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आता ते विचार करू लागले आहेत, नेमके मतदान कुणाला करायचे आहे? गावोगाव शर्यती लावल्या जात आहेत. ग्रामीण भागात कार्यकर्ता पेटून उठला आहे, एकमेकाच्या सभेत गोंधळ होऊ लागला आहे.
आमच्यासाठी काय केलं? हा प्रश्न विचारला जात आहे. पाटील, देशमुख, सरपंच आदी गावातील नेतेगण उमेदवारांना विश्वास देऊ लागले आहेत. आता ढाब्यावर गर्दी वाढेल आणि, तिथे मतदारराजा, ‘पाटील कसं तुम्ही म्हणताल तसं…’ असे म्हणू लागला आहे. एकंदर कोण निवडून येईल हे मात्र कुणीही सांगू शकत नाही. वातावरण मात्र चांगलेच ढवळून निघाले आहे. सोशल मीडियामुळे प्रचार सोपा झाला आहे, सभेचे लाईव्ह अपडेट घरी बसून पाहता येऊ लागल्याने, पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत ऑनलाईन सभा, ऑनलाईन मतदान, ऑनलाईन प्रचार सुरू होईल यात शंका नाही.
या निवडणुकीत महिलासुद्धा बाहेर पडल्या आहेत. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला प्रतिनिधी असणे आवश्यक असल्याचे सांगण्यास ते विसरत नाहीत. या वेळी आम्ही सांगू त्यांना मतदान करा, अशी विनंती घरातील महिला करत असल्याची कुजबुज पुरुष मंडळी करू लागली आहेत. इकडे पाटील तुम्ही म्हणता तसं, असा शब्द दिला असून, दुसरीकडे घरातील महिला मी म्हणेल तसं…असे म्हणू लागल्याने आम्ही कुणाला मतदान करायचं ….अशी चर्चा रंगू लागली आहे.