नागपूर : १९४७ च्या फाळणीनंतर जे लोक हिंदुस्थानात आले ते निर्वासित (रिफ्युजी) नव्हते, तर ते ‘संघर्ष योद्धे’ होते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. ‘फाळणीनंतर भारतात आलेल्या लोकांना निर्वासित म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी आपल्या मातृभूमी आणि ‘धर्मा’वरील प्रेमापोटी प्रचंड हालअपेष्टा आणि वेदना सहन केल्या’, असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले.
या लोकांनी नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानात अनेक पिढ्यांपासून कमावलेली आणि जोपासलेली आपली संपत्ती, जमीन आणि व्यवसाय मागे सोडले आणि भारतात येणे पसंत केले असे त्यांनी नमूद केले. भागवत बुधवारी नागपुरात सिंधी समुदायाद्वारे चालवल्या जाणा-या सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या ७५ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांनी सांगितले की, फाळणीनंतर लोकांनी जाणीवपूर्वक दुस-या बाजूने भारतात येण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना अशा भूमीत राहायचे होते जी भारतात आहे, जिथे ते कोणत्याही भीतीशिवाय आपल्या धर्माचे पालन करू शकतील.
‘ते विस्थापित झाले होते, ते निर्वासित नव्हते. त्या वेळी त्यांच्यासाठी वापरला गेलेला हा शब्द चुकीचा होता. ते संघर्ष योद्धे होते ज्यांनी आपल्या मातृभूमीवरील आणि आपल्या श्रद्धेवरील प्रेमापोटी संघर्ष केला. ते एक लढाई हरले पण ती त्यांच्या स्वत:च्या चुकांमुळे नव्हती’, असे सांगतानाच ते पुढे म्हणाले की, ‘भारताला अखंड ठेवण्याची ती लढाई आपण सर्वांनीच हारली होती. पण त्यांनी काय निवडले? त्यांनी आपले करिअर निवडले नाही, त्यांनी संपत्ती निवडली नाही. त्यांनी देशाची निवड केली, त्यांनी आपल्या धर्माची (श्रद्धेची) निवड केली.
















