वाई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारात ४०० पारचा नारा दिला होता. मात्र, जाहीर सभांमधून काँग्रेसच्या जाहीरनाम्यांची चर्चा करत असल्याची खोचक टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पीएम मोदींवर केली. वाईमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत चव्हाण यांनी मोदींवर जोरदार टीका केली. मोदी यांनी आपल्या कारकिर्दीचा १० वर्षांचा आढावा सादर करायला हवा होता. ते ४०० पारची घोषणा देत आहेत आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चर्चा करत आहेत. मोदी यांचा आत्मविश्वास ढळला असल्याची टीका त्यांनी केली.
मोदींच्या साता-यातील सभेची उपस्थिती पाहिल्यास निवडणुकीचा निकाल काय लागणार? याबद्दल कुणाच्या मनात शंका असायचे कारण नाही. सभेला माणसे मिळत नाहीत, पैसे देऊन माणसे गोळा करावी लागत असल्याची टीका चव्हाण यांनी केली. देशात आज नोक-या नाहीत, नरेंद्र मोदींनी अर्थ व्यवस्थेचे वाटोळे करून टाकले असल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी शरद पवार म्हणाले की, गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना एका भगिनीच्या घरात हल्ला झाला. अत्याचार केले, सास-याची हत्या केली. यामध्ये ज्यांना ११ वर्षांची शिक्षा झाली, त्यांची मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांची सुटका केली आणि गळ््यात हार घालत सन्मान केला. स्त्रियांची अब्रू घेणा-यांचा सन्मान करण्याचे धोरण जे स्वीकारतात, ते देशाचे हितचिंतक असू शकत नाहीत. त्यांना मत मागायचा अधिकार नाही.
देशहिताचे नाही, त्याला सातारकर धडा शिकविणार
जे देशाच्या हिताचे नाही, त्यांना धडा शिकवायची ताकद सातारकरांमध्ये आहे. शशिकांत शिंदे हे कष्टकरी कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांच्या रूपाने लोकसभेला उमेदवार दिला असून तुमच्या पाठिंब्यावर ते यशस्वी होतील, असेही त्यांनी सांगितले. इंग्रजांच्या काळात सातारकर घाबरला नाही. आता किरकोळ लोकांसमोरसुद्धा घाबरणार नसल्याचे ते म्हणाले.