बंगळूरू : कर्नाटकमध्ये नवीन सरकारचे गठन आणि खात्यांचे वाटप पूर्ण होताच काँग्रेसमधील अंतर्गत असंतोषाचा मोठा विस्फोट झाला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि नवनियुक्त कॅबिनेट मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी आपल्या मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. माझ्याशी केलेले वचन पक्षाने पाळले नाही, म्हणूनच मी हे मोठे पाऊल उचलत आहे अशा शब्दांत रेड्डी यांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आपण केवळ कॅबिनेट मंत्रीपद सोडत असून काँग्रेसचे आमदार आणि एक प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून पक्षातच काम करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शपथविधी पार पडल्यानंतर अवघ्या ४८ तासांच्या आत घडलेल्या या नाट्यमय घडामोडीमुळे नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारला हा पहिला आणि अत्यंत मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामलिंगा रेड्डी यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर थेट निशाणा साधला. रेड्डी यांनी दावा केला की डी. के. शिवकुमार स्वत: माझ्या घरी आले होते. त्यांनी मला शब्द दिला होता की जेव्हा मी मुख्यमंत्री बनेन, तेव्हा मी बंगळुरू विकास मंत्रालय सोडेन आणि तुम्ही ते सांभाळा. इतकेच नाही तर शपथविधीच्या अगदी एक दिवस आधी जेव्हा मी त्यांची भेट घेतली, तेव्हाही मला बंगळुरूशी संबंधित पोर्टफोलिओ देण्याचे आश्वासन पुन्हा देण्यात आले होते.
रेड्डी पुढे भावुक होत म्हणाले, मी कधीही स्वत:हून या खात्याची मागणी केली नव्हती, परंतु मला वारंवार त्याचा भरवसा देण्यात आला होता. दोनदा शब्द देऊनही आता माझ्याकडे जलसंपदा विभाग सोपवण्यात आला. या विश्वासघातामुळे मी प्रचंड निराश झालो असून म्हणूनच राजीनामा देत आहे.
समर्थकाकरवी पाठवला राजीनामा
रामलिंगा रेड्डी यांनी आपला राजीनामा स्वत: मुख्यमंत्र्यांकडे न सोपवता आपल्या एका समर्थकामार्फत मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांकडे पाठवला आहे. आपल्या त्यागपत्रात त्यांनी लिहिले आहे की, मंत्रिमंडळात मंत्रीपद दिल्याबद्दल मी तुमचा आणि काँग्रेस पक्षाचा आभारी आहे. तथापि, मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीच्या (अंतरात्मा) विरोधात जाऊन काम करण्यास असमर्थ असल्याने, मी मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे, कृपया तो स्वीकारावा.
















