अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) प्रथमच अधिकृत भूमिका मांडली आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी निवेदन जारी करत या घटनेमुळे देशभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दत्तात्रय होसबळे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीराम जन्मभूमीवरील भव्य मंदिर हे अनेक पिढ्यांच्यांच्या संघर्ष, त्याग आणि कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यामुळे मंदिरातील देणगीपेटीतील पैशांच्या कथित चोरीची घटना अत्यंत दुर्दैवी असून, यामुळे संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेला धक्का बसला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. तपासात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही होसबळे यांनी स्पष्ट केले. संघाने आपल्या निवेदनात मंदिर व्यवस्थापनालाही काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. मंदिराच्या आर्थिक व्यवहारात पूर्ण पारदर्शकता असावी, व्यवस्थापनातील त्रुटी तातडीने दूर कराव्यात आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खात्री करावी, अशी अपेक्षा संघाने व्यक्त केली आहे.
सध्या या प्रकरणामुळे भाविकांमध्ये अनेक प्रश्न आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन आणि विशेष तपास पथकाने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आणावे, असेही संघाने म्हटले आहे. दरम्यान, राम मंदिरातील देणगीपेटीतील पैशांच्या कथित अपहारप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे चालक टिन्नू यादव तसेच मंदिरातील देणगी मोजण्याच्या प्रक्रियेशी संबंधित काही कर्मचा-यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
















