नवी दिल्ली:भारतीय रेल्वेने दळणवळण क्षेत्रात आणखी एक मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. प्रवाशांच्या सेवेपाठोपाठ आता वंदे भारत संकल्पनेवर आधारित मालगाडी म्हणजेच वंदे भारत कार्गो लवकरच रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. या विशेष ट्रेनची चाचणी यशस्वी झाली असून, यामुळे देशातील मालवाहतूक आता अधिक वेगवान, सुरक्षित आणि सक्षम होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेने मालवाहतुकीचे अचूक व्यवस्थापन करण्यावर विशेष भर दिला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून देशातील पहिली वंदे भारत कार्गो ईएमयू लवकरच व्यावसायिक सेवेत रुजू होण्याची शक्यता आहे.
ही मालगाडी ताशी १३० किलोमीटर या विक्रमी वेगाने धावण्यास सक्षम आहे. या वेगामुळे ही कार्गो ट्रेन अनेक प्रवासी गाड्यांनाही मागे टाकेल. आतापर्यंत या ट्रेनच्या सर्व चाचण्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरल्या आहेत. सध्या आरडीएसओतर्फे विविध मापदंडांवर आधारित तिची अंतिम ऑसिलेशन चाचणी घेतली जात असून या ट्रेनची निर्मिती चेन्नई येथील रेल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात आली आहे.
या १६ कोच असलेल्या ट्रेनची एकूण माल वाहून नेण्याची क्षमता ३९७ टन इतकी आहे. यामध्ये माल चढवणे आणि उतरवणे सोपे व्हावे यासाठी सर्व कोचमध्ये रोलर बेड आणि मोठे स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत. तसेच दूध, भाजीपाला, फळे यांसारख्या नाशवंत वस्तू कमी तापमानात सुरक्षित वाहून नेण्यासाठी चिलर्स, रेफ्रिजरेटेड रीफर्स आणि फोर्ड व्हेंटिलेशनची खास व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेनचा वेग, वजन आणि इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक कोचमध्ये प्रगत सेन्सर्स देखील बसवण्यात आले आहेत.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हाय-स्पीड कार्गो ट्रेनचा प्राथमिक वापर दिल्ली-एनसीआर आणि मुंबई यांसारख्या देशातील प्रमुख व्यापारी मार्गांवर केला जाऊ शकतो. उर्वरित काही तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर, ही ट्रेन अधिकृतपणे व्यावसायिक सेवेसाठी ट्रॅकवर उतरेल. या सुविधेमुळे उद्योग जगताला मोठा फायदा होणार असून मालाची वाहतूक अत्यंत कमी वेळेत पूर्ण होईल.
















