मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठा बदल झाला असून भारतीय टी२० संघाच्या कर्णधारपदावरून सूर्यकुमार यादवला हटवण्यात आले. त्याच्याजागी श्रेयस अय्यर संघाचा नवा कर्णधार झाला. कॅप्टन्सीवरून हटवल्यामुळे आणि इंग्लंड-आयर्लंड दौ-यासाठीच्या संघातून वगळल्यामुळे स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव अधिकच चर्चेत आला. बीसीसीआयने त्याला कर्णधारपदावरून हटवण्याच्या धक्कादायक निर्णय तर घेतलाच, पण त्यासोबतच संघातूनही बाहेर केले. या सा-या प्रकारानंतर सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
२०२६ च्या टी२० विश्वचषकात भारताला विजय मिळवून देऊनही, सूर्यकुमार यादवने केवळ कर्णधारपदच गमावले नाही, तर आगामी मालिकेसाठीच्या संघातही त्याचा समावेश नाही. यादरम्यान, बीसीसीआयने नवीन संघ निवडल्यानंतर सूर्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. त्याने बीसीसीआयने जाहीर केलेला फोटो शेअर केला आणि लिहिले, “या अत्यंत सक्षम दमदार गटाला पुढील आव्हानांसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.
दुसरीकडे, टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सूर्यकुमार यादवला वगळण्याच्या निर्णयाबद्दल एका पत्रकार परिषदेत सांगितले, सूर्याच्या बाबतीत हा एक कठीण निर्णय होता. त्याचा फॉर्म आणि पुढील दोन वर्षांचे चक्र लक्षात घेता, आम्हाला वाटले की हाच सर्वोत्तम मार्ग असू शकतो. कारण श्रेयस अय्यर हा कर्णधार म्हणून निवडीसाठी पूर्णपणे पात्र आहे.
सूर्यकुमार यादवची आकडेवारी
सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाने एकूण ५२ सामने खेळले, त्यापैकी ४२ सामने जिंकले. विशेष म्हणजे, भारताने त्याच्या कर्णधारपदाखाली एकूण नऊ द्विपक्षीय मालिका खेळल्या आणि त्या सर्व जिंकल्या. इतकेच नाही, तर त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने एकही सामना न हरता आशिया कप ट्रॉफी जिंकली. त्याच्या कर्णधारपदाखाली त्यांनी टी-२० विश्वचषक विजेतेपदही राखले. तथापि, या काळात तो फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करू शकला नाही, ज्यामुळे बीसीसीआयला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले.
















