33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रस्वाभिमानी'चे राज्यभर चक्काजाम आंदोलन

स्वाभिमानी’चे राज्यभर चक्काजाम आंदोलन

कोल्हापूर : ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रुपये द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये रविवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे. बहुतेक ठिकाणी सकाळीच चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते.

ऊस दरासाठी तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. तरीही ऊस दराचा प्रश्न निकाली निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत, त्यामुळे रविवारी चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. राज्य सरकारला ऊस दरावर चर्चा करण्यास वेळ नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांना कोणतास रस दिसत नाही, असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. दरम्यान कर्नाटक सीमाभागातही आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिली आहे.

१३ सप्टेंबर पासून ऊस दरासाठी आंदोलन सुरू आहे. दि. १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे २२ वी ऊस परिषद झाली. तसेच ७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडागंणावर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या, अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR