डेहराडून: भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान तरुणांविषयी केलेल्या ‘कॉकरोच’ (झुरळ) आणि ‘परजीवी’ या टिप्पणीवरून सध्या देशभरात नवा वाद पेटला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ सोशल मीडियावर अचानक ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) नावाचे एक व्यंग्यात्मक डिजिटल आंदोलन उभे राहिले असून, त्याला कोट्यवधी तरुणांचा पाठिंबा मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता प्रसिद्ध कवी आणि प्रखरे वक्ते डॉ. कुमार विश्वास यांनी अत्यंत खोचक शब्दांत तंज कसला आहे. “जर देशात कॉकरोच तयार झाले असतील, तर बाजारात ‘हिट’ (HIT – झुरळ मारण्याचे औषध) देखील उपलब्ध आहे, या कॉकरोचचा इलाज केला जाईल,” असे विवादित वक्तव्य कुमार विश्वास यांनी केले आहे.
उत्तराखंडमधील डेहराडून येथे आयोजित ‘लेखक गाव’ (Writer’s Village) या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कुमार विश्वास आले होते. यावेळी माध्यमांनी त्यांना सोशल मीडियावर वादळ निर्माण करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’बाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी आपल्या नेहमीच्या उपरोधिक शैलीत या डिजिटल चळवळीवर आणि त्याशी जोडल्या गेलेल्या तरुणांवर कडाडून टीका केली.
कुमार विश्वास म्हणाले की, लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की कॉकरोच हा एक कीटक असून तो केवळ घाणीत आणि सडलेल्या ठिकाणीच पैदा होतो. हा एक टाकाऊ जीव आहे. मला कॉकरोचबद्दल पहिल्यांदा तेव्हा समजले जेव्हा मी मोठा झालो आणि माझ्या आईने सांगितले की, हे जीव नेहमी अंधारात राहतात आणि एकत्र गोळा होतात. कॉकरोच कोणत्याही चांगल्या आणि सुशोभित वस्तूवर आक्रमण करतात आणि आधीपासून तयार असलेल्या चांगल्या व्यवस्थांचा नाश करण्याचे काम करतात. पुढे बोलताना त्यांनी थेट इशारा देत म्हटले की, जर देशात अशा कॉकरोचची निर्मिती झाली असेल, तर त्यांचा नायनाट करण्यासाठी ‘हिट’ देखील सज्ज आहे. मग ते बंगाल असो की पंजाब, अशा कॉकरोचचा इलाज वेळेवर केला जाईल.
डॉ. कुमार विश्वास यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली असून तरुणांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक नेत्यांनी आणि बेरोजगार तरुणांनी कुमार विश्वास यांच्या या वक्तव्याला देशातील सुशिक्षित तरुणांचा घोर अपमान म्हटले आहे. “आम्ही हक्काचा रोजगार आणि पेपर लीक विरोधात आवाज उठवला तर आम्हाला किडा-मुंगी समजून मारण्याची भाषा केली जात आहे का?” असा सवाल आता सोशल मीडियावरून विचारला जात आहे.
हा सगळा वाद गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर सुरू झाला होता. राष्ट्रीय पातळीवरील NEET परीक्षा आणि इतर सरकारी परीक्षांच्या पेपर लीक प्रकरणांमुळे तरुण आधीच संतप्त असताना, सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले. त्यावरून हिंगोलीच्या अभिजित दिपके या तरुणाने सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ स्थापन केली, ज्याचे फॉलोअर्स अवघ्या काही दिवसांत थेट २ कोटींच्या पार गेले आहेत. आता या चळवळीला देशातील अनेक विरोधी पक्ष, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याने सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली असून, कुमार विश्वास यांच्या या नव्या वक्तव्यामुळे हा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.
















