नवी दिल्ली : लोकांना व्हॉट्सअॅपवरुन ‘विकसित भारत’ नामक जाहिरातीतून मोदींची गॅरंटी आणि मोदींनी केलेल्या कामाची माहिती पोहोचवली जात आहे. सध्या आचारसंहिता लागू झालेली आहे, तरीही व्हॉट्सअॅपवर सरकारी जाहिराती येत असल्याने याबाबतच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आयोगाने या जाहिराती व्हॉट्सअॅपवरुन पाठवणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने गुरुवारी सांगितले की, आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला निर्देश दिले आहेत की, जनतेच्या व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात येणारे विकसित भारतचे मेसेज तातडीने थांबविण्यात यावेत. तसेच आयोगाने आयटी मंत्रालयाकडून या प्रकरणाचा अनुपालन अहवालही मागवला आहे. दरम्यान, आयोगाने सांगितले की, याबाबत आमच्याकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले की, सध्या देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झालेली असतानाही लोकांच्या फोनवर सरकारी जाहिरातीत पाठवल्या जात आहेत.
मॅसेज आचारसंहितेपूर्वीचे?
निवडणूक आयोगाच्या आदेशाला उत्तर देताना आयटी मंत्रालयाने सांगितले की या जाहिरातीसंबंधीचे पत्र आणि मेसेज आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाठवण्यात आले होते. पण लोकांच्या मोबाईलला कदाचित व्यवस्थित नेटवर्क येत नसल्याने हे मेसेज उशीरा रिसिव्ह झाले असतील.