सोलापूर :
सोलापुरातील रेल्वे उड्डापुलाच्या रुंदीकरणाच्या कामास मंजुरी मिळूनही अद्याप काम सुरू होण्यास मुहूर्त लागेना. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनीही महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांना भेटून अडथळे दूर करून काम सुरू करा, अशा सूचना दिल्या होत्या, मात्र त्यानंतरही प्रमुख तीन अडथळ्यांमुळे आसरा पुलाचे काम सुरू होण्यास बिलंब होत आहे. त्यामुळे नागरिक, सामाजिक संघटनांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूर शहरातील जुळे सोलापूरला होटगी रोडशी जोडणारा आसरा रेल्वे पुल छोटा आहे. जुळे सोलापूरवासीयांचे हे प्रवेशद्वार म्हणून -ओळखले जाते. काही कार्यक्रमकिंवा जड वाहन आल्यास एक तासभर वाहतुकीची समस्या निर्माण होते. त्याचबरोबर रुंदीने छोटा पूल असल्यामुळे कित्येक अपघातही झाले होते.
त्यामुळे हा रेल्वे पूल विस्तारित व्हावा, त्याची रुंदी वाढवावी यासाठी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या कामाची विनंती करून प्रस्ताव पाठविला होता, त्यास मंजुरीही मिळाली होती. निविदा काढून काम सुरू करण्याचे आदेश दिले होते, मात्र चार महिने उलटूनही काम सुरू झालेले नाही. आता लोकसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. त्यानंतर आणखी काही महिने तर काम सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे जुळे सोलापूर, आसरा परिसरात नागरिकांतून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जलवाहिनी बदलण्यासाठी महापालिकेने १० कोटींची मागणी केली आहे. यासंदर्भात शासनासोबत लवकरच मिंिटग घेण्यात येणार आहे. वर्कऑर्डर निघालेली आहे, मात्र तीन अडथळ्यांमुळे काम थांबले आहे. निधी मंजूर झाल्यानंतर काम सुरू होईल. आता लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे थोडा वेळ लागेल. लवकरात लवकर निधीचा विषय मार्गी लागला तर काम सुरू होईल.असे आमदार सुभाष देशमुख म्हणाले.
वर्कऑर्डर काढून सहा महिने झाले, मात्र अद्याप पुलाचे काम सुरू झालेले नाही. जलवाहिनीचे स्थलांतर करायचे होते तर यापूर्वीच महापालिकेने सांगायचे होते. ऐन काम सुरू करण्यापूर्वीच ही अडचण सांगितली आहे, त्यामुळे महापालिकेचा आंधळा कारभार पाहावयास मिळत आहे. स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींनी रेटा लावून निधी उपलब्ध करून द्यावा. काम सुरू होण्यास आणखी वेळलागण्याची शक्यता आहे. असे संभाजी ब्रिगेड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी सांगीतले.