मुंबई : प्रतिनिधी
देशभरात लोकसभा निवडणूक ऐन रंगात आली आहे. महाराष्ट्रातही आज तिस-या टप्प्यातील निवडणुकांसाठी अनेक नेत्यांचा वेगवेगळ््या भागात प्रचारांचा धडाका पाहायला मिळाला. राज्यात मंगळवारी तिस-या टप्प्यासाठी ११ मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. यामध्ये रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले अशा ११ मतदारसंघात समावेश आहे. या मतदारसंघांत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून महायुती आणि मविआच्या दिग्गज नेत्यांनी या ११ मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवला होता. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनीसुद्धा आपल्या उमेदवारांसाठी सभांचा धडाका लावला होता तर मविआच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांनी प्रचाराचा जोर लावला होता. आज अखेर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. ७ तारखेला मतदान पार पडणार आहे.
तिस-या टप्प्यात लातूरमधून कॉंग्रेसचे शिवाजी काळगे आणि भाजपचे सुधाकर शृंगारे, धाराशिवमधून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या अर्चनाताई पाटील, सोलापुरात कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते, माढ्यात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात, साता-यात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यात, सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, कोल्हापुरात कॉंग्रेसचे छत्रपती शाहू महाराज आणि शिंदे गटाचे संजय मंडलिक, हातकणंगलेत शिंदे गटाचे धैर्यशील माने, स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांच्यात तिरंगी, रायगडमध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे अनंत गिते, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक कुलकर्णी यांच्यात लढत होत असून, यांचे भवितव्य मंगळवार मतदान यंत्रांत बंद होणार आहे. या टप्प्यात ब-याच लढती हायहोल्टेज आहेत.
देशभरात उद्या होणार ९४ जागांसाठी मतदान
लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील प्रचाराची रविवारी सांगता झाली. या टप्प्यात १२ राज्ये, केंद्राशासित प्रदेशातील ९४ जागांसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये गुजरातमधील सर्वच म्हणजे २६ जागा, कर्नाटकातील १४, उत्तर प्रदेशातील १०, मध्य प्रदेशातील ८ आणि छत्तीसगडमधील ७ आणि महाराष्ट्रातील ११ लढतींचा समावेश आहे.