मोहोळ : शहराला पाणीपुरवठा करणारी सीना नदी कोरडी पडली आहे. त्यातील उरलेसुरले पाणी अवघे चार दिवसच पुरणार असल्याने शहरावर पाणी संकट निर्माण झाले आहे. यंदा पाऊस कमी झाला असून, उजनी धरण झपाट्याने खालावत आहे. शेवटचे आवर्तन सुटेल याची शाश्वती नाही. त्यामुळे शहरवासीयांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. यासाठी वेळीच उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे; अन्यथा मोहोळ शहरातील पाण्याच्या बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. मोहोळ शहरातील अनेक लोकांच्या बोअरचे पाणी आटले आहे.
त्यामुळे शहरवासीय विकत पाणी घेताना दिसून येत आहेत. त्याशिवाय पर्याय नाही. मोहोळ नगरपरिषदेच्या मालकीची असणारी विहीर मोडकळीला आलेली आहे. त्यामध्ये प्रचंड गाळ साचला आहे. हा सर्व गाळ काढून पुढे पाषाण लागेपर्यंत त्याची खोदाई व आरसीसी बांधकाम केल्यास पाण्याची पातळी वाढून जुन्या मोहोळ शहराचा पाणीप्रश्न अंशतः मिटविण्यास मदत होणार आहे. परिणामी उन्हाळ्यात माता-भगिनींची होणारी भटकंती कमी होईल. याबाबत मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांनी तत्पर कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सीना नदीच्या पात्रातील खड्ड्यात असलेल्या पाण्यातून शहराला पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी संपण्याच्या मार्गावर आहे. मोहोळ शहराला टैंकरशिवाय पर्याय नाही. जो तो खासदार प्रचारात मिरवत आहेत; पण मोहोळ शहराच्या विकासाबाबत कोणताच नेता मनावर घेत नाही. सध्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे.सीना नदी कोरडी पडण्याच्या पाणीपुरवठा करणारा आष्टे बंधारा कोरडा पडला आहे. बैलाच्या साह्याने चारी पाडून नदीच्या खड्यातील पाणी विहिरीत सोडले जाणार आहे.असे पाणी व आरोग्य अधिकारी अमित लोमटे यांनी सांगीतले.