मुंबई : आम्हाला मजबूत सरकार पाहिजे पण ते संमिश्र हवे. सर्वांना सोबत नेणारा कणखर नेता पाहिजे. जो देईल साथ, त्यांचा करू घात, अशी व्यक्ती, असा पक्ष आम्हाला नको आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आम्हाला ‘भारत सरकार’ हवे आहे. ‘मोदी सरकार’ नको आहे. यंदाच्या निवडणुकीत लोकशाहीविरोधात एकाधिकारशाही, हुकूमशाही यांची थेट लढत होणार असल्याचेही ते म्हणाले. भारत राष्ट्र समितीचे जळगावचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडी आणि देशात ‘इंडिया’ आघाडी मजबूत होत असल्याचे सांगितले. राज्यात आणि देशात परिवर्तन घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमचे जागावाटप आणि सूत्र ठरले आहे. आता महाविकास आघाडीच्या एकत्रित सभाही सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच जागावाटप झाल्याने प्रत्येक पक्षाने आपल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना समजवावे.