मुंबई : आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. ६ जूनपासून न्यू चंडीगड येथे एकमेव कसोटी सामना खेळला जाईल. त्यानंतर १३ जूनपासून धर्मशालाच्या मैदानातून दोन्ही संघातील वनडे मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्रायू दुखापतीमुळे विराट कोहली या मालिकेला मुकणार असल्याचे समोर येत आहे. आता त्याची जागा कोण घेणार? हा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. सध्याच्या घडीला ऋतुराज गायकवाड दावेदार मानल जात आहे. देवदत्त पडिक्कल आणि तिलक वर्मा हे त्याला तगडी फाईट देऊ शकतील.
आयपीएल २०२६ दरम्यान झालेल्या हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकू शकतो. माजी भारतीय कर्णधार अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नसून, तो नेमका केव्हा पुनरागमन करेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. विराटने यंदाच्या आयपीएल हंगामात शानदार कामगिरी करत ५६.२५ च्या सरासरीने आणि १६५ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ६७५ धावा केल्या. त्याच्या नावावर एक शतक आणि पाच अर्धशतके होती. मात्र अहमदाबाद येथे गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात स्रायू दुखापतीनंतरही तो मैदानात तग धरून उभा राहिला होता.
दुसरीकडे, रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी उपलब्ध असेल की नाही, याबाबतही अजून साशंकता आहे. अनुभवी सलामीवीराने अद्याप बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये हजेरी लावलेली नाही, जिथे त्याला फिटनेस चाचण्या द्यायच्या आहेत. रोहितचे नाव वनडे संघात असले तरी अंतिम मंजुरी वैद्यकीय पथकाकडून मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे निवड समिती आणि संघ व्यवस्थापन त्याच्या फिटनेसबाबत स्पष्टतेची वाट पाहत आहे.
















