लातूर : प्रतिनिधी
अगोदरच पाचवीला पुंजलेला दुष्काळ, कांदा, दूधाला नसलेला बाजारभाव, वेळी अवेळी पडणारा अवकाळी पाऊस या संकटामुळे अगोदरच संकटात सापडलेला शेतक-याच्या संत्रीला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने हवालदील झाला आहे. कुणी संत्री घेता का रे संत्री, असे म्हणण्याची वेळ शेतक-यांवर आल्याचे बाजारात दिसून येत आहे.
तळहाताच्या फोडाप्रमाणे शेतकरी फळबागांची काळजी घेतो. मात्र यंदा शेतक-यांचा खरिपा पाठोपाठ रब्बी हंगामही वाया गेला आहे. अल्पक्ष पावसामुळे यंदा फळबागांचा मृग बहारही कमी प्रमाणात बहरला आहे. काही ठिकाणी मृग बहारमधील संत्रा सध्या तोडणीला आहे. परंतु, सध्या बाजारात एकाच वेळी नागपूर, अमरावती, राजस्थान येथीलही संत्रा बाजारात आल्याने संत्राला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. पर्यायाने शेतक-यांना कवडीमोल भावात संत्रा विकावा लागत आहे. फळबागेत केलेला खर्चही वसूल होत नाही.
त्यामुळे शेतक-यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढवले आहे. गेल्या काही दिवसापासून शहरातील बाजारात संत्रीची मोठी आवक होण्यास सूरूवात झीली आहे. त्यामुळे बाजारात कुणी संत्री घेता का अशी वेळ शेतक-यावर आली आहे. शहरातील बाजारात जवळपास दिवसाला २ टन संत्रीची आवक होत असल्याचे व्यापारी वर्गाने सागीतले आहे. तर किरकोळ बाजारात मात्र संत्री चड्या दरात विक्री होत आहे. शहरातील किरकोळ बाजारात ६० रुपये किलो प्रमाणे विक्री केली जात आहे. यंदा नागपूर, अमरावती, राजस्थान येथील संत्रा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बाजारात आला आहे. तसेच नगरमधील संत्रा बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. एकाच वेळी सर्व ठिकाणची संत्री बाजारात आल्याने सध्या बाजारभाव कमी झाले आहेत. अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहील बसा अंदाज व्यापारी अरबाज बागवान यांनी वर्तवला आहे.