मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) यंदाच्या हंगामात अत्यंत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या Mumbai Indians संघात मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संघाचा कर्णधार Hardik Pandya याच्या नेतृत्वावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून आगामी हंगामापूर्वी त्याच्याकडून कर्णधारपदाची धुरा काढून घेतली जाऊ शकते, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे.
यंदाच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सला १४ पैकी तब्बल १० सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. परिणामी पाच वेळा आयपीएल विजेता राहिलेला हा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर घसरला. गेल्या सहा वर्षांपासून संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे संघाच्या कामगिरीबाबत मालक, व्यवस्थापन आणि प्रशिक्षक वर्गामध्ये गंभीर आत्मपरीक्षण सुरू असल्याचे समजते.
कर्णधारपदावरून सुरू झाली चर्चा
मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाबाबत संघ व्यवस्थापनामध्ये आधीपासूनच काही प्रमाणात साशंकता होती. यंदाच्या हंगामात संघाची कामगिरी खालावल्यामुळे ही चर्चा अधिक तीव्र झाली आहे. केवळ कर्णधारपदच नव्हे तर संघातील हार्दिकच्या भविष्यातील भूमिकेबाबतही अंतर्गत स्तरावर विचारमंथन सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.संघ व्यवस्थापनातील काही सदस्य हार्दिकला पुढील हंगामात फक्त खेळाडू म्हणून कायम ठेवण्याच्या पर्यायावरही चर्चा करत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांत मुंबई इंडियन्सच्या संघरचनेत मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतरची बैठक चर्चेत
या चर्चांना आणखी बळ देणारी घटना म्हणजे राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अखेरच्या सामन्यानंतर झालेली प्रशिक्षक मंडळाची विशेष बैठक. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत वरिष्ठ खेळाडूंना स्पष्ट संदेश देण्यात आला की, संघासाठी कोणत्याही स्थानावर खेळण्याची आणि त्यानुसार तयारी ठेवण्याची मानसिकता आवश्यक आहे. प्रशिक्षकांनी डेटा आणि विश्लेषणाच्या आधारे अनेक सूचना दिल्या होत्या. मात्र काही खेळाडूंनी त्या गांभीर्याने घेतल्या नाहीत, अशी नाराजीही बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे समजते. यामुळे संघातील समन्वय, नेतृत्व आणि निर्णयप्रक्रिया याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
व्यवस्थापन करणार सखोल आत्मचिंतन
मुंबई इंडियन्सच्या अपयशामागील कारणांचा शोध घेण्यासाठी संघ व्यवस्थापन लवकरच व्यापक आढावा बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे. संघ निवड, नेतृत्व, खेळाडूंची कामगिरी, रणनीती आणि प्रशिक्षक मंडळाच्या भूमिकेचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून कायम ठेवायचे की नवीन नेतृत्वाला संधी द्यायची, यावरही गंभीर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच संघातील काही वरिष्ठ खेळाडूंच्या भूमिकांमध्ये बदल होऊ शकतात.
नव्या नेतृत्वाचा पर्याय?
क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, मुंबई इंडियन्ससारख्या यशस्वी फ्रँचायझीसाठी सलग अपयश स्वीकारणे सोपे नाही. त्यामुळे पुढील हंगामासाठी संघ नव्या नेतृत्वाचा विचार करू शकतो. संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल राखत नव्या रणनीतीसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान, हार्दिक पांड्या किंवा मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाकडून या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र संघाच्या कामगिरीमुळे निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
















