धाराशिव : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतक-यांशी संवाद साधत त्यांची व्यथा जाणून घेतली. लातूरसह धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत नुकसानीची पाहणी केल्यानंतर बोलताना त्यांनी केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून मदत करीत शेतक-यांची कर्जमुक्ती करावी, असे म्हटले. सरकारने संकटग्रस्त शेतक-यांना कर्जमुक्त केले नाही तर कर्जमुक्तीसाठी शेतक-यांसोबत शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा सरकारला दिला.
आज सकाळपासून मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त भागात धावती भेट घेतली. माझ्यासोबत शिवसेनेचे सहकारी आहेत. आपल्या माध्यमातून संकटाची भीषणता सर्वांना कळलेली आहे. मी मराठवाड्यातील जनतेला आणि शेतक-यांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. मुख्यमंत्री म्हणाले तसे यात राजकारण आणायचे नाही. सरकारने जाहीर केलेली मदत तूटपुंजी आहे. एकरी साडेतीन ४ हजार मिळत आहेत. नुकसान झाले, त्याची साफसफाई करायला गेले तर त्याच्या दुप्पट खर्च येणार आहे, म्हणजे सरकार शेतक-यांची थट्टा करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
मुसळधार पावसामुळे जमीन खरडून गेली, पीक सडून गेले, घरे-दारे वाहून गेली, गुरे वाहून गेली, शेळ््या-मेंढ्या वाहून गेल्या. एकूणच शेती, शेतकरी आणि आजुबाजूला राहणा-या नागरिकांचे आयुष्यच वाहून गेले, असे ठाकरे म्हणाले. सरसकट कर्जमाफीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करीत उद्धव ठाकरे यांनी तुमची योग्य वेळ कधी येणार आहे. पंचांग बघून, मुहूर्त काढून सांगणार आहात का, शेतक-यांना सरसकट कर्जमुक्ती दिली पाहिजे, आम्ही शेतक-यांसोबत आहोत. ती मागणी पूर्ण न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला.
पंजाबप्रमाणे हेक्टरी ५० हजार रुपये द्या
उद्धव ठाकरे यांनी पंजाब राज्यात काही दिवसांपूर्वी असे संकट आले, त्यावेळी तेथील आप सरकारने शेतक-यांना कालबद्ध मर्यादेत मदत जाहीर केली, ती हेक्टरी ५० हजार रुपये. पंजाब सरकार देत असेल तर महाराष्ट्र सरकारने द्यायला काही हरकत नाही.
नुकसान पाहता मदत तुटपंजी
जमीनच वाहून गेली आहे तर शेतकरी किती अडचणीत आला आहे, याची जाणीव सरकारने ठेवावी. आता शेतक-यांना जगण्यासाठी मोठी मदत आणि कर्जमाफीची गरज असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. दुष्काळी भागात प्रथमच अतिवृष्टी झाली. त्यामुळे पूरपरिस्थितीचे मोठे संकट कोसळले. सरकारची मदत २०२३ च्या निकषांप्रमाणे असून नुकसान पाहता जाहीर केलेली मदत तुटपंजी आहे, अशा शब्दांत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
मुख्यमंत्र्यांनी आमच्या समस्या ऐकल्या नाहीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी लातूर जिल्ह्याच्या दौ-यावर येऊन गेले. त्यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. परंतु ते आले आणि निघून गेले, त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत, अशा शब्दांत शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली.
अजित पवार यांची ही मस्ती
लाडक्या बहिणींसाठी ४५ हजार कोटी खर्च करत आहोत, असे अजित पवार म्हणाले ही मस्ती आहे. त्यातील घोटाळे बाहेर येत आहेत, तो वेगळा भाग झाला. लाडक्या बहिणीच्या घरी १५०० रुपये दिले जातात. एवढ्या पैशांत त्या बहिणीचे घर सावरणार आहे का, याचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
लातूर जिल्ह्यातही केली पाहणी
गेल्या २ दिवसांपासून राज्याचे मंत्रिमंडळ मराठवाडा दौ-यावर असतानाच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला व शेतक-यांना बांधावर जाऊन दिलासा दिला. मराठवाडा दौ-यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लातूर जिल्ह्यातील काटगाव आणि तांदुळजा येथील शेतक-यांची भेट घेऊन व्यथा जाणून घेतली आणि आपल्या हाती काही नाही. मात्र, धीर देण्यासाठी आलो असल्याचे सांगत खचू नका, वेडवाकडे पाऊल उचलू नका, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवतो, अशी साद त्यांनी घातली.
उद्धव ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यातील शेतक-यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर धाराशिवसाठी रवाना झाले. लातूरमधील काटगावमध्ये आणि तांदूळजामध्ये शेतक-यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर साहेब आमची कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी आपल्याला मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खा. संजय राऊत, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, मिलिंद नार्वेकर, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांची उपस्थिती होती.
















