मुंबई : प्रतिनिधी
शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली आज होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. रविवारी राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. मात्र, भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत परीक्षेपूर्वी मुख्य पेपरमधील प्रश्न फोडण्यात आले आणि एकच खळबळ उडाली. या प्रकरणात तीन जणांना काल पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामागे दिल्ली कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान या पेपरफुटीचा फटका ४ लाख २८ हजार १२२ परीक्षार्थींना बसला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल ४ लाख २८ हजार १२२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. आज या परीक्षेचा पेपर होणार होता. मात्र काल भिवंडीतील कोनगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, काही जण टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सापळा रचून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून टीईटी परीक्षेचे चार प्रश्नसंच जप्त करण्यात आले.
संबंधित आरोपींना अटक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिका-यांनी या प्रश्नपत्रिकांची पडताळणी केली असता त्यातील काही प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक आरोपी हरियाणाचा तर दोन आरोपी बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे.
पेपरफुटीचे दिल्ली कनेक्शन
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा पेपर दिल्लीहून आणण्यात आला होता आणि त्याचा व्यवहार तब्बल दीड कोटी रुपयांत ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा पेपर नेमका कोणाला विकण्यात येणार होता, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच इतर ठिकाणीही प्रश्नपत्रिका विकली गेली आहे का, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज किंवा शुल्क भरण्याची आवश्यकता नसून परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
















