मुंबई : प्रतिनिधी
पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक कालावधी होऊनही अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची टंचाई जाणवत आहे, तर दुसरीकडे टोमॅटो, कोथिंबीर, बाग, मेथी, पालक, कोबीसह इतर भाजीपाल्यांचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. पाण्याची टंचाई, वाढता उत्पादन खर्च व घसरलेले बाजारभाव अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
पिकांना पाणी देण्यासाठी वीज, इंधन, मजुरीचा खर्च वाढत असतानाच बाजारात मालाला भाव मिळत नसल्याने शेतक-यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. सुरुवातीला झालेल्या पावसावर सोयाबीन, मका व खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने अनेकांनी टोमॅटो, भेंडी, वांगे, कोथिंबीर, मेथी यांसारख्या भाजीपाला पिकांना पसंती दिली.
जलस्रोतांवरील ताण वाढला
पावसाने दडी मारल्याने विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांवरील ताण वाढत चालला आहे. पिकांना आवश्यक त्या प्रमाणात पाणी देणे कठीण होत असून शेतक-यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. पाणी उपलब्ध ठेवण्यासाठी वीज, इंधन, मजुरी आणि सिंचनावर मोठा खर्च करावा लागत आहे. त्यातच शेती साहित्याचे दर वाढल्याने खर्चात वाढ झाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.
खरीप हंगाम संकटात
पावसाअभावी ओढे, नाले, तळी आणि लहान-मोठे पाणवठे कोरडे पडले आहेत. पावसाच्या आशेवर शेतक-यांनी खरीप हंगामातील पिकांची लागवड केली. मात्र, ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाने साथ न दिल्याने सोयाबीन, बाजरी, मका तसेच इतर पिकांवर परिणाम झाला आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे.
जनावरांच्या चा-याचा प्रश्न
विहिरी, बोअरवेलमधील पाण्याचा वापर करून पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पावसाअभावी हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषत: शेळी-मेंढीपालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चा-याच्या उपलब्धतेबरोबरच त्याच्या वाढत्या दरामुळे पशुपालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
सणासुदीच्या काळात आर्थिक अडचण
गणेशोत्सवासह सणासुदीच्या काळात पावसाअभावी ग्रामीण भागात शेतक-यांना आर्थिक अडचण जाणवू लागली आहे. शेतीचे उत्पन्न धोक्यात आल्याने शेतक-यांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. दुसरीकडे उन्हाचा कडाका वाढल्याने शीतपेय व इतर थंड पदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या बारामती तालुक्याला दमदार आणि सलग पावसाची नितांत गरज आहे.
















