मुंबई : घराची बेल वाजवल्यावर दरवाजा उघडून तो आपटणे, वरच्या आवाजात बोलणे, दुपारी या, घरात कोणी नाही, असे एसएमएस पाठवणे, घराच्या दरवाजावर उभ्या असलेल्या महिला बीएलओना घरात बसण्यास सांगून दार लावणे. आदी घटनांमुळे बीएलओ महिला असुरक्षित आहेत. त्यामुळे घरोघरी भेटी देणे धोक्याचे ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम सुरू असून या कामकाजासाठी सर्वाधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात मोठ्या प्रमाणात महिला शिक्षिका आहेत.
सकाळी शाळेतील जबाबदारी पार पाडून दुपारनंतर दिलेल्या परिसरात निवडणूक आयोगाचे गणना प्रपत्र वाटणे, एवढेच नाही तर ते पत्र मतदारांनी भरल्यानंतर पुन्हा जाऊन आणणे, त्यानंतर ते योग्यरीत्या भरले की नाही, याची खातरजमा करून ऑनलाईन प्रक्रिया पार पाडावी लागत आहे. हे काम करत असताना महिला बीएलओना प्रत्येकाच्या घरोघरी किमान दोन ते तीन वेळा जावे लागत आहे. या भेटीदरम्यान अनेक महिला बीएलओना वाईट अनुभव आले आहेत.
काही इमारतींमध्ये महिला बीएलओना आत येण्यास बंदी घालण्यात येते. प्रवेश दिला तर सदनिकाधारकांची बोलणी ऐकावी लागतात. अनेकजण उंच आवाजात बोलत शिव्याही घालतात. एका मतदार संघात घरोघरी जाऊन हे काम करत असताना एका महिला बीएलओला चक्क घरात बसण्यास सांगितले.
घरात कुटुंबातील कोणीतरी असेल यामुळे फॉर्म कसा भरावा, हे समजून सांगण्यासाठी महिला बीएलओ घरात बसल्या. तर लगेच त्या घरातील व्यक्तीने दरवाजा लावला. त्यामुळे धोका लक्षात येताच, क्षणाचाही विलंब न लावता दरवाजा उघडून महिला कशीबशी बाहेर पडली.
या घटनेबद्दल महिला बीएलओने बीएलओच्या ग्रुपवर तक्रारही केली. आपल्या सहक-यांना झालेली घटना सांगितली. या अशा घटनांमुळे बीएलओ महिला शिक्षिका असुरक्षित असल्याचे स्पष्ट होते
















