परभणी : मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यातून जाणारा नागपुर-गोवा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग शेतकरी कृती समितीच्या वतीने दि.१८ रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.
या कृती समितीचे मराठवाडा समन्वयक राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बाधित शेतक-यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. या निवेदनात मराठवाड्यातील शेतजमीन ही अनेक सिंचन कालवे, नद्या, विहिरी व तलाव अंतर्गत कायमस्वरुपी बागायती आहे. परंतु, या महामार्गामुळे बाधित ही सर्व नैसर्गिक किंवा कृत्रिम साधन संपत्ती नष्ट होणार आहे. तर महामार्ग सोडून राहिलेली उर्वरित हजारो हेक्टर जमीन ही पाण्याअभावी नापीक किंवा दुष्काळी होणारी आहे असे निवेदनात म्हटले आहे.
ज्या शेतक-यांचा उदरनिर्वाह या शेतीवर अलवंबून आहे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असून बरेच शेतकरी भूमीहीन होवून त्यांच्यावर स्थलांतर करण्याची वेळ येवू शकते अशी खंत व्यक्त करण्यात आली. सद्य पस्थितीत वृक्षतोड झाल्यामुळे जागतिक तापमानात भयंकर वाढ होतांना दिसत आहे. या महामार्गासाठीही कोटींच्या घरात वृक्षतोड होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्नही निर्माण होईल या सर्व बाबींचा विचार करता शेतक-यांच्या हितासाठी हा शक्तीपीठ महामार्ग राज्य शसनाने रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर राजन क्षीरसागर, बाधित शेतकरी गोविंद घाटोळ, विठ्ठलराव गरुड, गंगाधर रणवीर, कुंडलिक बेले, आनंद घाटोळ, दयानंद यादव, पंडीत घुसळे, नामदेव उफाडे, अंगद शिंदे, महादेव चांगभले, प्रल्हाद चांगभले, मिराबाई चांगभले, रामकिशन चांगभले, योगेश चांगभले, शिवराज दामोधर, विजय बेले, कुंडलिक खंडागळे, गोपाळ खंदारे, नवनाथ आणेराव, सदाशिव आणेराव आदींच्या स्वाक्ष-या आहेत.