मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात यंदा मान्सूनची वाटचाल अपेक्षेप्रमाणे झालेली नसताना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ४ आणि ५ सप्टेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर मराठवाड्याच्या काही भागांत पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाची स्थिती कमकुवत होण्याची शक्यता असून, १० ते २४ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भ, मराठवाड्यात तूट
दरम्यान, राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे. मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २७ टक्के कमी, तर विदर्भात २४ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. जून आणि जुलै महिन्यात देखील पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची तूट आहे. ऑगस्ट महिन्यातही पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने सप्टेंबरमधील काही दिवसांच्या पावसाकडे शेतक-यांचे लक्ष लागले आहे.
पूर्व विदर्भाला ‘यलो अलर्ट’
दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाची निर्मिती
पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किना-यालगत समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वा-यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम पुढील काही दिवसांत मध्य भारतातील हवामानावर होण्याची शक्यता आहे.
पावसाची तूट कायम
२७ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान पूर्व भारतात चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे. याच काळात ४-५ सप्टेंबरदरम्यान मध्य भारत, विदर्भ आणि उत्तर मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, १० सप्टेंबरनंतर महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज असल्याने काही दिवसांचा वाढलेला पाऊस राज्यातील एकूण तूट भरून काढण्यासाठी पुरेसा ठरणार का, याकडे लक्ष लागले आहे.
















