४०० भारतीय सुरक्षित, एकूण मृत व्यक्तींचा आकडा ५७७ वर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नेपाळमध्ये आलेल्या भीषण महाप्रलयात आतापर्यंत तब्बल ५७७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नेपाळ सरकारने आज दिली. तसेच अद्याप एकूण १९०० पेक्षा जास्त लोक बेपत्ता असून, यामध्ये ३२० भारतीयांचा समावेश आहे. मदत व बचाव कार्याद्वारे सध्या शोध मोहीम वेगात सुरू आहे. मात्र, अद्याप त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. दरम्यान चीनच्या बाजूने तिबेट प्रदेशात असलेल्या ४०० भारतीयांशी संपर्क झाला असून, ते सुरक्षित आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाने ही माहिती दिली. त्यातच चीनमधून १५३ भारतीय नेपाळमध्ये पोहोचल्याचीही माहिती आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी चीनच्या बाजूला आमचे ४०० भारतीय नागरिक आहेत. ते सुरक्षित आहेत. ते त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. आमचा दूतावास त्यांच्यापैकी अनेकांच्या संपर्कात आहे. त्यांच्या अनेक कुटुंबीयांनी बीजिंगमधील आमच्या दूतावासाद्वारे चालवल्या जाणा-या हेल्पलाइन क्रमांकांवरून आमच्याशी संपर्क साधला, असे म्हटले. तसेच चीनमधील आमचा दूतावास स्थानिक अधिका-यांच्या संपर्कात आहे आणि तेथे अडकलेल्या या लोकांना कसे बाहेर काढायचे यावर ते काम करत आहेत, असेही ते म्हणाले.
पूरग्रस्त भागातून काल काठमांडूमध्ये आलेले भारतीय नागरिक आज दिल्लीत पोहोचले. यातील २१ भारतीय नागरिक तामिळनाडूचे आहेत. काल आमच्या राजदूतांनी काठमांडूमध्ये त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. याशिवाय त्रिशुली वन जलविद्युत प्रकल्पात काम करणा-या ६३ भारतीय नागरिकांविषयीही माहिती दिली. त्यांनाही काल सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तसेच चीनच्या बाजूला अडकलेले १५३ भारतीय नागरिक रस्तामार्गे सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले आहेत. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या भारतीय लोकांशी संपर्क होऊ शकलेला नाही किंवा जे बेपत्ता आहेत, त्यांची संख्या सध्या ३२० आहे, असेही जयस्वाल यांनी सांगितले.
भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरात शहरे आणि गावे जलमय झाली असून अनेक घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. रसुवा आणि नुवाकोटमधील अनेक गावे चिखल व ढिगा-याखाली गाडली गेली असून जलविद्युत प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले. रस्ते आणि पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यात बचाव पथकांना मोठ्या अडचणी येत आहेत. घरे, बाजारपेठा, शेती आणि सरकारी इमारती चिखलाखाली दबल्या गेल्या आहेत. संपूर्ण वस्त्या नामशेष झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
भारताने नेपाळला पाठविली मदत
नेपाळवर ही दुर्घटना घडल्याच्या दिवशीच आम्ही मदतकार्य सुरू केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. पहिले विमान २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी रवाना झाले. त्यात तात्पुरती निवारागृहे, ब्लँकेट्स, स्वच्छता किट, सौर दिवे आणि औषधांसह १० टन मदत साहित्य होते. त्यानंतर दुसरे विमान २७ ऑगस्ट रोजी सकाळी रवाना झाले. या विशेष विमानातून तंबू, ब्लँकेट्स, स्वच्छता किट, सौर दिवे, वॉटर पंप, किचन सेट, जनरेटर सेट, औषधे आणि खाद्यपदार्थ आदी साहित्य पाठविले. त्यानंतर आजही एक विमान रवाना झाले.
बेपत्ता लोकांचा
आकडा १९०० वर
नेपाळमध्ये मदत व बचावकार्य वेगात सुरू आहे. परंतु अजूनही ९७७ पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये ५१७ परदेशी नागरिक, नेपाळी लष्कराचे ४५ जवान आणि नेपाळी पोलिसांचे ४१ जवान यांचा समावेश आहे. तिबेटमध्ये ५५८ लोक बेपत्ता आहेत. ही आकडेवारी सांगितली जात असली तरी बेपत्ता लोकांचा आकडा १९०० वर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
आणखी एक तलाव फुटला!
नेपाळ-तिबेट सीमेजवळील आणखी एक तलाव फुटला. चोचेन नदी आणि पुरेपु त्सांगपो नदीच्या संगमाजवळ तयार झालेला हा तलाव आहे. एक दिवसापूर्वीच चीनने तो फुटण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. तलाव फुटल्यानंतर पाण्याची पातळी वाढू लागली आहे. धोक्यामुळे रसुवा जिल्ह्यातील बचावकार्य ९० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले आहे. भोटेकोशी, त्रिशुली आणि नारायणी नद्यांजवळील अनेक गावे रिकामी केली जात आहेत.
महाराष्ट्रातील एकूण
१०६ पर्यटक परतले
नेपाळला महाप्रलयाचा तडाखा बसल्याने महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तेथे अडकले होते. त्यापैकी १०६ जण शुक्रवारी बिहारमधील सीतामढी येथे पोहोचले. महाराष्ट्र सरकारने याबाबत बिहार सरकारशी संपर्क साधून माहिती दिली होती. त्यानुसार सीतामढी जिल्हा प्रशासनाने मदतकार्य सुरू करून सीतामढीत आणले आहे. दरम्यान, आणखी ८४ पर्यटक सुखरूप पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले.
















