Homeसंपादकीय विशेषशेतक-यांसमोर दुहेरी संकट

शेतक-यांसमोर दुहेरी संकट

मार्च आणि एप्रिल महिन्याच्या प्रारंभी अवकाळी पाऊस आणि ओला दुष्काळ पडल्याने गहू, मोहरी, कडधान्य, बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकट्या महाराष्ट्रात २ लाख हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवरचे पीक वाया गेले आहे. राजस्थानात बिकानेरच्या अर्जुनसर भागातील शेतक-यांच्या मते, त्यांचा गहू, मोहरी आणि तृणधान्याचे पीक मातीमोल झाले. पीक विम्याची भरपाई उशिरा मिळत असल्याने अडचणीत वाढ झाली आहे. अर्थात ही स्थिती पहिल्यांदाच उद्भवली असे नाही तर तो अलीकडच्या काळातील नवीन पॅटर्न असून तो सतत अनुभवास येत आहे.

काही दिवसांपूर्वीच्या अवकाळी पावसाने देशातील अनेक भागात शेतीचे नुकसान केले आहे. एकीकडे पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना देशात नैसर्गिक संकटाने शेतक-यांना अडचणीत आणले आहे. अवकाळी पावसाचा मारा सहन करणा-या राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील मालहा गावात जगप्रसिद्ध केवलादेव राष्ट्रीय पक्षी अभयारण्य असून इथूनच काही अंतरावर राहणारे शेतकरी पेचात सापडले आहेत. सध्या या भागात हवामान बदल किंवा भू राजनितीवर कोणतीही चर्चा होताना दिसत नाही; परंतु नैसर्गिक संकटामुळे निर्माण झालेल्या प्रश्नावर मार्ग काढायचा विचार करत आहेत.

मागील आठवड्यात मालहाचे वॉर्ड सदस्य आणि शेतकरी उदयभान यांनी अवकाळी पावसाने झालेली आपबिती सांगितली. ते म्हणाले, शेतक-यांची स्थिती खूपच शोचनिय आहे. कापणीचा हंगाम सुरू होताना पावसाने आमच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यंदा दोन महिने अगोदरच पाऊस पडला. अर्थात हे सर्व हवामान बदलामुळे होत आहे; परंतु त्यांची व्यथा इथेच संपत नाही. ते म्हणतात, सध्या सामान्य शेतक-यांना मजुरी देणे परवडत नाही. जागतिक संघर्षाने प्रत्येक गोष्टींच्या किमती वाढत आहेत. युरिया, डीएएफच्या (डाय अमोनियम फॉस्फेट, भारतात सर्वाधिक वापर होणा-या फॉस्टफेटिक खतांपैकी एक) किमती गगनाला भिडत आहेत. या भागातील शेतकरी मोहरी आणि आगामी खरीप पिकासाठी खतांचा साठा करत आहेत. पुढे काय होणार? हे कोणालाच ठाऊक नाही. एक अल्प भूधारक आणि गहू घेणा-या शेतक-यानेदेखील अशीच भीती व्यक्त केली. आगामी काळात डिझेल, पेट्रोलची टंचाई जाणवू शकते आणि त्याची भाववाढ होऊ शकते; पण जी मंडळी सामानाची साठवणूक करू शकतात तेच अशा प्रकारची कृत्रिम टंचाई निर्माण करू शकतात, असे त्याचे म्हणणे आहे. या भागातील शेतक-यांना पश्चिम आशियातील संघर्षाचे बारकावे ठाऊक नाहीत.

त्यांना शस्त्रसंधीची स्थितीदेखील कळत नसली तरी खेडापोडी राहणा-या लाखो ग्रामीण नागरिकांसाठी हवामान बदल आणि भू राजनितीचे धोके वेगळे नाहीत. वास्तविक हे दोन प्रकारचे संकट म्हणता येईल. एकीकडे कालपरत्वे येणारे संकट म्हणजे ते आशेला कर्जाच्या रुपात बदलतो आणि निराशेचे वातावरण तयार करतो. रब्बीची पिके कापणीसाठी तयार असताना पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतक-यांवर डोळ्यादेखत पीक नष्ट होताना पाहण्याची वेळ आली. भरतपूरच्या ‘द कोर्टयार्ड’मध्ये काम करणा-या एका वेटरने सांगितले की, पहाटे ४ वाजता शेतात काम करतो आणि नंतर नोकरीवर जातो; परंतु अवकाळी पावसाने गव्हाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगताना त्याला अश्रू अनावर झाले होते. दुसरे संकट म्हणजे मानवनिर्मित संघर्षाचे होणारे अप्रत्यक्ष परिणाम. मार्च आणि एप्रिल महिन्याच्या प्रारंभी अवकाळी पाऊस आणि ओला दुष्काळ पडल्याने गहू, मोहरी, कडधान्य, बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

एकट्या महाराष्ट्रात २ लाख हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवरचे पीक वाया गेले आहे. राजस्थानात बिकानेरच्या अर्जुनसर भागातील शेतक-यांच्या मते, त्यांचा गहू, मोहरी आणि तृणधान्याचे पीक मातीमोल झाले. पीक विम्याची भरपाई उशिरा मिळत असल्याने अडचणीत वाढ झाली आहे. अर्थात ही स्थिती पहिल्यांदाच उद्भवली असे नाही तर तो अलीकडच्या काळातील नवीन पॅटर्न असून तो सतत अनुभवास येत आहे. हिवाळ्यात येणारे वेस्टर्न डिस्टबर्न्स आता वसंत ऋतूतही बराच काळ राहत आहेत. शास्त्रज्ञांना हा बदल हवामान बदलाचा परिणाम वाटतो. या कारणामुळे वातावरणाच्या पॅटर्नमध्ये आमुलाग्र बदल होत आहे. त्याचा परिणाम म्हणजे वातावरण कोरडे राहण्याची अपेक्षा असताना मुसळधार पाऊस, गारा आणि वादळी वा-याची स्थिती निर्माण होते. शेतातील उभे गव्हाचे पीक आडवे होते, धान्य शेतातच वाया जाते आणि साहजिकच त्याची गुणवत्ता खराब होते. मागच्याच पावसाने हतबल झालेले शेतकरी बाहेर पडलेले नसताना आताच्या दुहेरी संकटाचा मार सहन करत आहेत. हवामानाचा तडाखा बसण्याबरोबरच पश्चिम आशियातील तणावाने त्यांचे गणित बिघडले आहे. नैसर्गिक गॅस आणि खतासाठी भारत आखाती देशांतून होणा-या पुरवठ्यावर अवलंबून आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीजवळच्या अडचणींमुळे युरिया आणि अन्य सामानांच्या किमतीत वाढ झाली आहे. परिणामी खरिपाची लागवड होण्यापूर्वी शेतकरी भयभीत होऊन खरेदी करत आहेत. तज्ज्ञांचा इशारा पाहिला तर पश्चिम आशियात पुढेही स्थिती कायम राहिली तर देशात खतांच्या उत्पादनात प्रचंड घसरण होऊ शकते. डिझेलच्या वाढलेल्या किमतीदेखील शेतक-यांना ताण देणा-या आहेत. रब्बी पीक वाया गेल्याने नुकसान सहन करणा-या शेतक-यांना आता पुढील हंगामाची तयारी करताना आणखी खिसा रिकामा करावा लागणार आहे. लहान आणि अल्प भूधारक शेतक-यांना याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागणार आहे. या शेतक-यांची संख्या अधिक आहे. अनेक महिने कष्ट घेत, बियाणे खरेदी आणि कर्ज घेतल्यानंतर अनेक शेतक-यांना हातचे पीक पावसामुळे गमवावे लागले आहे त्यामुळे नुकसानीचा आकडा मोठा आहे. काही भागात शेतीच्या समस्या असताना या अवकाळी पावसाने आणखी भर घातली आहे.

वनीकरण आणि मत्स्य पालनाचा समावेश असलेले कृषी क्षेत्र देशात ४५ ते ४६ टक्के रोजगार देण्याचे काम करते आणि जीडीपीतही त्याचे योगदान १८ टक्के आहे. त्याच वेळी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देते. अन्नधान्यांच्या किमती स्थिर ठेवण्यास मदत करते आणि १.४ अब्ज लोकांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्रदान करते. अशा स्थितीत गव्हाच्या उत्पादनात थोडीतरी घसरण झाली तर खरेदी, बफर स्टॉक आणि बाजाराच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर अन्नधान्यांची महागाई वाढू शकते आणि त्याचा सर्वाधिक परिणाम किमत वाढीवर होतो. पोषण कार्यक्रमावर परिणाम होतो आणि त्याचा फटका पीडित कुटुंब आणि गरिबांना अधिक बसतो. एकप्रकारे आर्थिक, सामाजिक आणि रणनिती पातळीवरचा धोरणात्मक कमकुवतपणा दर्शवितो. कृषी क्षेत्रात गुंतवणूक करणारे हतबल होतात आणि कृषी क्षेत्रावरचे वाढते संकट पाहता स्थलांतराची प्रक्रिया वेगाने होते.

ज्या देशात अन्नधान्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही तेथे अशा प्रकारची स्थिती निर्माण होणे आणि अस्थिरतेकडे दुर्लक्ष करणे हे एकप्रकारे मोठे संकट ओढवून घेण्यासारखे आहे. शेतक-यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करत वेळेवर भरपाई देणे गरजेचे आहे. दीर्घकाळाचा विचार केल्यास भारताने हवामान बदलानुसार पीक घेण्याची गरज आहे तसेच चांगले वाण, हवामानाचा अंदाज संगणारी सक्षम प्रणाली, पाणी व्यवस्थापन, खत क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळवणे यासारख्या गोष्टींवरदेखील काम करायला हवे. अस्थिरतेवर मात करण्यासाठी पुरवठा साखळीत वैविध्यपणा आणण्याची आवश्यकता आहे. भारताची विकास गाथा शेतक-यांना वगळून लिहता येणार नाही. उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब किंवा महाराष्ट्रातील शेतक-यांना अस्मानी संकटाची किंवा मानवनिर्मित तणावाची झळ पोहोचते तेव्हा त्याचे पडसाद देशात उमटतात.

-पत्रलेखा चटर्जी, ज्येष्ठ पत्रकार

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR