महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर आपल्या नेतृत्वगुणांनी, अमोघ वक्तृत्वाने आणि जनमानसावरील पकडीने तब्बल चार दशके अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विलासराव देशमुख. लातूर जिल्ह्यातील बाभळगावचे ‘सरपंच’ ते देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत आणि महाराष्ट्राचे ‘मुख्यमंत्री’ पदापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे केवळ एका नेत्याची यशोगाथा नाही, तर तो एका सामान्य घरातील तरुणाचा अथक संघर्ष, संयम आणि ध्येयवादाचा जिवंत दस्तऐवज आहे.
विलासरावजींच्या संपूर्ण प्रवासाकडे पाहताना प्रकर्षाने जाणवते ती त्यांची ‘तळागाळातील नाळ’. आजच्या काळात राजकारणात थेट वरच्या पदांवर उडी मारण्याची स्पर्धा लागलेली असताना, विलासरावजींनी मात्र लोकशाहीच्या प्राथमिक शाळेतून म्हणजेच ग्रामपंचायतीतून आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. बाभळगावचे सरपंच, पुढे जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि अखेर राज्याचे मुख्यमंत्री… लोकशाहीचा प्रत्येक जिना त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने चढला. यामुळेच प्रशासनावरील त्यांची पकड आणि सर्वसामान्य माणसाच्या सुख-दुःखाची जाण अत्यंत अचूक होती.
त्यांच्या नेतृत्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ‘सर्वसमावेशकता’ आणि ‘संवादकौशल्या’. राजकारणात अनेक वादळ आली, पक्षांतर्गत आणि विरोधकांकडून आव्हाने उभी राहिली, पण विलासरावजींनी कधीही संवादाचा मार्ग सोडला नाही. विरोधकांनाही आपलेसे करणारे त्यांचे खुसखुशीत, हजरजबाबी वक्तृत्व आणि चेहऱ्यावरील ते स्मितहास्य ही त्यांची कवचकुंडले होती. “शत्रूचेही मन जिंकता आले पाहिजे,” हा जणू त्यांचा स्वभावच होता. त्यामुळेच आघाडीचे सरकार चालवताना विविध विचारसरणीच्या पक्षांना एकत्र ठेवून त्यांनी महाराष्ट्राला स्थैर्य दिले.
मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारे ठरले. मुंबईचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास असो, माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील क्रांती असो, किंवा ग्रामीण भागातील जलसंधारणाची कामे असो; विलासरावजींनी आधुनिकता आणि ग्रामीण विकास यांचा सुरेख संगम साधला. लातूरसारख्या दुष्काळी भागाचा कायापालट करून त्याला शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. लातूर पॅटर्न हे त्यांच्याच दूरदृष्टीचे फलित.
“राजकारण हे सत्तेसाठी नाही, तर समाजकारणाचे साधन आहे,” हा विचार त्यांनी केवळ बोलून दाखवला नाही, तर आपल्या कार्यातून सिद्ध केला.
अर्थात, हा प्रवास सोपा नव्हता. १९९५ च्या पराभवासारखा मोठा राजकीय धक्का असो, किंवा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागलेले प्रसंग असो; विलासरावजी कधी खचले नाहीत. प्रत्येक संकटातून ते फिनिक्स पक्षासारखे झेप घेत अधिक ताकदीने उभे राहिले. हाच त्यांचा संघर्ष आजच्या पिढीला ‘संयम’ आणि ‘जिद्द’ शिकवतो.
आज विलासराव देशमुख आपल्यात नसले, तरी त्यांनी निर्माण केलेला नेतृत्वाचा आदर्श, त्यांनी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय आणि महाराष्ट्राच्या विकासाचा पाया आजही मार्गदर्शक ठरत आहे. ‘सरपंच ते मुख्यमंत्री’ हा त्यांचा प्रवास महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक सुवर्णपान असून, संघर्षातून यशाचे शिखर कसे गाठावे, याचा वस्तुपाठ आहे. लोकनेत्याच्या या धगधगत्या आणि यशस्वी प्रवासाला विनम्र अभिवादन!
















