मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेविरोधात आणि संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी आज मुंबईत मंत्रालयाबाहेर एक अत्यंत थरारक आणि अंगावर काटा आणणारे आंदोलन पाहायला मिळाले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांनी मंत्रालयाबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन केले.
राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ अटी-शर्तींची असून ती संपूर्णपणे फसवी आहे, असा आरोप करत रविकांत तुपकर यांच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयावर धडक दिली. राज्यातील शेतक-यांना कोणत्याही अटींशिवाय विनाअट पूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, अशी प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन सुरू झाले होते. आंदोलन तीव्र होताच मंत्रालयाबाहेर तैनात असलेल्या मोठ्या पोलिस बंदोबस्ताने रविकांत तुपकर आणि त्यांच्या सहका-यांना बळाचा वापर करून ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
गळ्यात दोरी अडकवून झाडावर चढले शेतकरीपुत्र
एकीकडे पोलिस तुपकरांना गाडीत टाकत असतानाच, दुसरीकडे आंदोलक अधिकच आक्रमक झाले. काही आंदोलक शेजारील एका मोठ्या झाडावर चढले. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे या आंदोलकांनी आपल्यासोबत दो-या आणल्या होत्या. झाडाच्या फांदीला दोरी बांधून ती थेट स्वत:च्या गळ्यात अडकवून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
सरकारने तात्काळ विनाअट कर्जमुक्तीची घोषणा करावी, अन्यथा आम्ही याच झाडावर गळफास घेऊन आमचे आयुष्य संपवू, असा आर्त टाहो आंदोलकांनी झाडावरून फोडला.
पोलिस यंत्रणेची उडाली धांदल
व्हीडीओ व्हायरल
मंत्रालयासारख्या व्हीआयपी परिसरात भरदिवसा गळ्यात फास लावून तरुण झाडावर चढल्याने मुंबई पोलिसांची आणि प्रशासनाची प्रचंड धांदल उडाली. आंदोलकांना खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांकडून मनधरणी सुरू करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा थरार कार आणि रस्त्यावरून जाणा-या नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमे-यात कैद केला आहे. गळ्यात दोरी घालून घोषणाबाजी करणा-या शेतकरी पुत्रांचा हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर वा-यासारखा व्हायरल होत असून, शेतक-यांच्या या उद्विग्नतेमुळे सरकारवर तीव्र टीका होत आहे.
शेतक-यांच्या सातबाराच्या प्रती विधान भवनाच्या दिशेने फेकल्या
विधान भवन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही तुपकर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. काही क्षणांतच त्यांनी शेतक-यांच्या सातबाराच्या प्रती विधान भवनाच्या दिशेने फेकल्या. त्याचबरोबर सोयाबीन आणि कापूस उधळून शेतक-यांच्या घामाची किंमत द्या, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्या, ‘सरकारने दिलेला शब्द पाळा’ अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनामागे गेल्या महिन्यातील अन्नत्याग आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. १५ जून ते १९ जूनदरम्यान बुलडाण्यातील निवासस्थानासमोर रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमुक्तीसह विविध शेतकरी मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेक ठिकाणी रास्ता रोको, जाळपोळ, आत्मदहनाचे प्रयत्न आणि संतप्त आंदोलनांनी सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता.
















