लातूरसह नांदेड, परभणी, हिंगोलीला भूकंपाचा धक्का
नांदेड : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ब-याच भागांत पावसाने धुमाकूळ घातलेला असताना पावसाच्या प्रतीक्षेत असलेला मराठवाडा बुधवारी मध्यरात्रीनंतर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. लातूरसह मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत हे धक्के जाणवले. धक्कादायक म्हणजे परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना २ तासांत ४ धक्के जाणवले. त्यामुळे अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले. बुधवारी रात्री १.३७ वाजल्यापासून ३.२३ पर्यंत ४ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.६ ते ४.६ रिश्टर स्केल अशी होती. त्यामुळे नागरिक भयभित झाले.
लातूर जिल्ह्यासह हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के बसले. त्यात हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात ४ धक्के जाणवले. जिल्ह्याच्या आपत्कालीन केंद्रावर १.३७ वाजता, २.१५ वाजता, २.१७ आणि ३.२३ वाजता या भूकंपाची नोंद झाली. या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ४.६, ३.६, ३.९ आणि ४.१ इतकी मोजण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या शिरली गावात होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. जेव्हा हे धक्के जाणवले, तेव्हा बहुतेक लोक झोपेत होते. परंतु जे जागी झाले ते घाबरून घराबाहेर पडले.
हिंगोली, नांदेड आणि परभणी परिसरातील अनेक लोकांना हे धक्के जाणवले. पहिल्या धक्क्याचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात पांगरा शिंदे गावाच्या दक्षिणेला असलेल्या शिरली गावाजवळ होता. त्याची खोली १० किलोमीटर मोजण्यात आली. त्यानंतरच्या दोन धक्क्यांचे केंद्रबिंदू पांगरा शिंदे गावाच्या वायव्येला असलेल्या काकरढाबा गावाजवळ होते, त्याचीही खोली १० किलोमीटर होती.
दरम्यान,भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले. हिंगोली जिल्ह्यात रात्री २ तासांत ४ धक्के जाणवले. ४.६ रिस्टर स्केल हा भूकंप सर्वात जास्त तीव्रतेचा होता. या भूकंपाचे सर्वांत जास्त हादरे तालुक्यातील ग्रामीण भागात बसले.
एकाच रात्रीत ४ धक्के
बसण्याची पहिली वेळ
गेल्या ६ वर्षांत हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कळमनुरी आणि वसमत तालुक्यांमध्ये ३७ हून अधिक सौम्य भूकंपाचे धक्के नोंदवले गेले. मात्र, एकाच रात्रीत चार भूकंपाचे धक्के बसण्याची ही पहिलीच घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांत घबराट पसरली.
धाराशिव जिल्ह्यात गूढ आवाज
धाराशिव जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात सातत्याने गूढ आवाज येतात. हा आवाज आणि त्यामुळे बसणा-या हाद-यांची तीव्रता जवळपास पूर्ण जिल्ह्यात जाणवते. अनेकदा कच्च्या भिंतीला किरकोळ तडे, तावदाने फुटणे, असे प्रकारही समोर आले. मात्र, अधिकृतपणे हे हादरे नेमके कशामुळे बसतात, याची शास्त्रीय स्पष्टता समोर आलेली नाही.
















