उदगीर : प्रतिनिधी
उदगीरसह तालुक्यात सायंकाळी विजांच्या कडकडाटास पाऊस झाला या झालेल्या बेमोसमी पावसाने उन्हाळी पिकांसह भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसापासून उदगीर तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अधून मधून ठिकठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या मात्र बुधवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वा-यासह विजेच्या कडकडासह अनेक महसूल मंडळात मोठा अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे वातावरण बदलले असून याचा फटका शेतक-यांना बसला आहे. उदगीर तालुक्यातून एकूण आठ महसूल मंडळात ही अवकाळी पाऊस झाला. उदगीर तालुक्यातील वांगे. भेडी. कांदे, शेगा ऊस ही पिके वादळी वारा, पावसामुळे आडवी पडली आहेत तर भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान होऊन टोमॅटो मिरची कारली आदी फड जमीनदोस्त झाली आहेत.
तातडीने पंचनाम्याची मागणी
बेमोसमी झालेल्या पावसामुळे उन्हाळी पिके व भाजीपाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा फटका फळबाग उत्पादकांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सध्या अंब्याचा मोसम आहे. वादळी वा-यामुळे अंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करुन तातडीने पंचनामे करण्यात यावेत तसेच नुकसान भरपाई मिळण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पीडित शेतक-यांतून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.