पंढरपूर : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिलेल्या नोंदी रद्द करणे ही आमची चूक होती, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावे, अशी मागणी जरांगे यांनी केली. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला हेही मान्य करावे, असे ते म्हणाले.
पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली चूक सुधारण्याची भूमिका घेतल्याचा दावा करत फडणवीस यांनीही त्याच पद्धतीने भूमिका घ्यावी, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, दिलेल्या नोंदी रद्द करणे ही आमची चूक होती, हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला हे त्यांनी मान्य करावे. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्यामार्फत आपली झालेली चूक सुधारू, असे सांगितले, तशीच भूमिका फडणवीस का घेत नाहीत? त्यांना संपूर्ण समाजाचा रोष अंगावर घ्यायचा आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले, फडणवीस हे पहिले फडणवीस राहिले नाहीत. गेले वर्षभर मी त्यांच्यावर कोणताही शब्द बोललो नाही. मात्र ते ओबीसीचे रक्त आहे असे सांगतात, म्हणजेच ते ओबीसीचे मुख्यमंत्री आहेत. पण, मराठा समाजावर अन्याय कशाला करता?, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
कुणबी प्रमाणपत्रे आणि नोंदी रद्द करण्याच्या मुद्यावरूनही मनोज जरांगे यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले, ‘‘दाखले रद्द करण्यात बावनकुळे आणि संजय शिरसाट हे दोघे असून दोघांचीही पत्रे आमच्याकडे आहेत. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. यावेळी मी एकदा तरी छगन भुजबळ आणि त्या धनंजय मुंडेचे नाव घेतले का? जरी माझा त्यांच्यावर राग असला तरी मी पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करत नाही, असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.
मी कोणाचाही नसून फक्त मराठ्यांचा
आपल्या आंदोलनामागे कोणताही वैयक्तिक राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट करताना मनोज जरांगे म्हणाले, ‘‘मी कोणाचाही नसून मी फक्त मराठ्यांचा आहे. कुणाशीही संबंध वाढवण्यासाठी मी आंदोलने करत नाही. फडणवीस साहेब, तुम्ही गैरसमजात राहू नका. यांना बहुमताची मस्ती आहे, मात्र ही मस्ती आम्ही उतरवू, आता यांना सुट्टी नाही, असा इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
















