पुणे : प्रतिनिधी
मर्सडीज बेंज, फॉक्सवॅगण, स्कोडा, ुंदाई यांसारख्या जागतिक कंपन्यांमुळे चाकण एमआयडीसीची एक वेगळी ओळख आहे. पण इथले खड्डे, अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि होणारे अपघात नित्याचे झाले आहेत. या त्रासाला कंटाळून २० लघुउद्योगांनी त्यांच्या कंपनीला टाळे लावण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
चाकण एमआयडीसीमधील २० कंपन्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसी स्थलांतरित होणार आहेत. त्यासाठी या वीस कंपन्यांनी संघटना स्थापन केली. त्याद्वारे जागा मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु केल्यात. या वीस कंपन्या स्थलांतरित झाल्यावर एक हजार कोटींच्या उलाढलीवर परिणाम होणार आहे, चार हजार कर्मचा-यांवर बेरोजगारीची कु-हाड पडणार आहे. चाकण आणि परिसरातील अभूतपूर्व वाहतूक कोंडीतून सुटका होत नसल्यानं चाकण एमआयडीला हा मोठा फटका बसायला सुरुवात झाली आहे.
चाकण एमआयडीसीतील २० लघुउद्योगांना टाळे ठोकले जाणार आहे. त्यामुळे चार हजार कामगारांवर बेरोजगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. आता मुलांच्या शाळांचे काय करायचे? कर्ज कसे फेडायचं? अशी चिंता या चार हजार कुटुंबांना लागलेली आहे. प्रशासन आणि सरकार खड्डे बुजवू शकत नाही, वाहतूक कोंडीतून मुक्तता करु शकत नाही. त्यांच्या या नाकर्तेपणामुळं चार हजार कामगारांवर ही वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया कर्मचा-यांनी व्यक्त केली आहे.
उपासमारीची वेळ येईल
आम्ही खूप त्रासलेलो आहोत ट्रॅफिकमुळे. दररोज जाताना-येताना दीड तासापेक्षा जास्त वेळ जातो. त्यामुळे आम्ही कौटुंबिक याच्यामध्ये आम्हाला वेळ देता येत नाही आणि कामाच्या निमित्त त्यातच खूप वेळ जातो. या ट्रॅफिक कोंडीमुळे आम्ही सगळेच खूप त्रस्त झालेलो आहोत. रोजगार तर खरोखरच जाणारच आहे. पण आम्ही आमच्या साहेबांनाही आम्हाला सांगितले आहे, की आम्ही शिफ्ट करणार आहोत. आम्ही मागणी सरांकडे मागणी केलीय की, आपण सरकार दरबारी आपली समस्या मांडावी व त्यातून मार्ग काढावा. कुटुंबात तिघे जण आहोत आम्ही. जर कधी जॉब गेला तर नक्कीच उपासमारीची वेळ येईल आणि जे कर्जाचे हप्ते वगैरे जे आहेत, ते फेडण्यास नक्कीच अडचण येईल, अशी प्रतिक्रिया एका कामगाराने दिली.
अमोल कोल्हेंनी राज्य सरकारवर टीका
चाकण एमआयडीसीची अवस्था आता अत्यंत वाईट आहे. खड्ड्यांच साम्राज्य, वाहतूक कोंडी हा अत्यंत मोठा विषय आहे. ५९ कोटी रुपयांच रस्त्याचं टेंडर निघूनही खड्डे बुजवले जात नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली. तसेच मी राज्य सरकारला वारंवार याबाबत पत्र दिली आहेत. १९ लोकांचे बळी या खड्ड्यांच्यामुले गेले आहेत, याला जबाबदार कोण आहे?, असा सवालही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.
















