मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशात राजकारण तापले असतानाच महाराष्ट्रात एमएच-सीईटी परीक्षेत महाघोटाळा झाल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार आणि महादेव बालगुडे यांनी एमएच-सीईटी निकालात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.
यावर आता सीईटी सेलचे अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पेपरफुटीच्या आरोपांचे सीईटी सेलकडून खंडन करण्यात आले आहे. सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली आहे. सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई म्हणाले की, सीईटी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण पारदर्शकपणे दाखवते. सध्या आलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने अंतर्गत विश्लेषण केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. सोशल मीडियावरचे दावे दिशाभूल करणारे आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे.
सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई म्हणाले की, सीईटी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण पारदर्शकपणे दाखवते. सध्या आलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने अंतर्गत विश्लेषण केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. सोशल मीडियावरचे दावे दिशाभूल करणारे आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे. ‘काही विद्यार्थी बोर्डापेक्षा सीईटीला जास्त प्राधान्य देतात, त्यामुळे त्यांना सीईटी परीक्षेत जास्त गुण असतात. दोन परीक्षांमध्ये तुलना करणे चुकीचे आहे. टक्के आणि पर्सेंटाईल यांची तुलना चुकीची आहे,’ असे त्यांनी यावेळी म्हटले.
‘एका परीक्षेत असलेल्या कामगिरीप्रमाणे दुस-या परीक्षेतही तशीच कामगिरी दिली पाहिजे, ही अपेक्षा योग्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज या दोन्ही पद्धती वेगळ्या आहेत. पर्सेंटाईल पद्धती ही त्या-त्या बॅचसाठी असते, त्यामध्ये जो टॉपर असतो त्याला १०० पर्सेंटाईल म्हणतात. त्याचा रॉ स्कोअर ७०, ८० किंवा ९० टक्के, कितीही असू शकतो. पण, तो त्या बॅचमध्ये टॉपर असल्याने त्याला १०० पर्सेंटाईल म्हणतात. याचा अर्थ असा नव्हे की १०० टक्के गुण मिळाले आहेत, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिले. सोशल मीडियावर जे दावे करण्यात येत आहेत, ते दिशाभूल करणारे आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. असे स्पष्टीकरण आयुक्त सरदेसाई यांनी दिले आहे. या दाव्यांबद्दल सीईटी सेलकडून आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, पोलिस, सायबर विभागाकडे चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.
















