जळगाव : प्रतिनिधी
एकवेळेस शेतक-यांना लोडशेडिंगचा थोडा त्रास झाला तरी आम्ही सहन करू, पण उद्योजकांना विजेचा तुटवडा होता कामा नये, असे वादग्रस्त विधान राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगाव येथील अतिरिक्त वीज ट्रान्सफॉर्मरच्या (५एमव्हीए) लोकार्पण सोहळ्यात बोलताना गुलाबराव पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना आणि उपस्थित उद्योजकांना संबोधित केले.
उद्योजकांची बाजू मांडताना ते म्हणाले की, आमची हात जोडून विनंती आहे की, एकवेळेस शेतक-यांना थोडा त्रास झाला तरी आम्ही सहन करून घेऊ, पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका. कारण उद्योजकाला मजुरांना पैसे द्यायचे असतात. लाईट गेली म्हणून तो मजुरांना पैसे नाकारू शकत नाही. त्यात त्याचा प्रोडक्शनचा मोठा लॉस होतो. जर सतत लाईट जात असेल, तर नवीन उद्योजक इथे कारखाने टाकण्यास तयार होणार नाहीत. या उद्योगांमुळेच आमच्या परिसरातील ५००-१००० मुलांना किमान रोजगार मिळतो.
शेतक-यांना दिवसा लाईट
यासोबतच त्यांनी आपल्या मतदारसंघातील कामाचे कौतुक करताना म्हटले की, जळगाव ग्रामीण हा असा एकमेव मतदारसंघ आहे जिथे आता शेतक-यांना शेतात १००% दिवसा लाईट मिळते. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्याची आणि सापा-विंचवांची शेतक-यांची धास्ती कमी झाली आहे. जिल्हा नियोजन समितीतून ह्याहावितरणला १३० कोटी रुपये देणारा मी एकमेव पालकमंत्री असेल, ज्यामुळे जिल्ह्यात ७५० ट्रान्सफॉर्मर उभे राहिले आणि पेंडन्सी कमी झाली, असा दावाही त्यांनी केला.
स्मार्ट मीटरवरून अधिका-यांना कानपिचक्या
भाषणाच्या शेवटी त्यांनी महावितरणच्या अधिका-यांना वाढत्या वीज बिलांवरून चिमटा काढला. तुमच्या स्मार्ट मीटरचे आमच्यावर लय प्रेम आहे, ते जरा सांभाळा बाबा! लोक रोज सकाळी एवढी मोठी वीज बिले घेऊन माझ्या घरी येतात, असे म्हणत त्यांनी वाढत्या बिलांबाबत नाराजी व्यक्त केली.
रोहिणी खडसे यांचा गुलाबराव पाटलांवर घणाघात
गुलाबराव पाटलांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर (ट्विटर) द्वारे खरपूस टीका केली आहे.
पालकमंत्र्यांना आठवडाभर उपाशी ठेवा
रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, पालकमंत्री महोदय म्हणतात की शेतक-यांना वीज नसली तरी चालेल, पण उद्योजकांना विजेचा तुटवडा होता कामा नये! वाह रे वाह… यांना आठवडाभर उपाशी ठेवले पाहिजे, तेव्हाच त्यांना अन्नधान्य पिकवणा-या शेतक-यांचे महत्त्व कळेल! निवडणुकीत शेतक-यांच्या नावाने मते मागायची आणि सत्तेत आल्यावर उद्योगपतींच्या मांडीवर जाऊन बसायचे… हे सरकारचे चांगलेच चालले आहे, असा घणाघात त्यांनी केला.
महायुती सरकारवर निशाणा
या वक्तव्यातून महायुती सरकारचा खरा चेहरा समोर आला असून, हीच या सरकारची शेतकरी आणि शेतीविषयीची भूमिका आहे, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांच्या या विधानामुळे आणि रोहिणी खडसे यांच्या आक्रमक टीकेमुळे जळगावच्या आणि राज्याच्या राजकारणात ‘शेतकरी विरुद्ध उद्योजक’ हा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
















