बारामती : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला सहा महिने पूर्ण होऊनही तपासाचा अंतिम निष्कर्ष समोर न आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तपास यंत्रणांनी विलंब न करता अहवाल प्रसिद्ध करून अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं, हे जनतेसमोर मांडावं, अशी मागणी त्यांनी केली.
अजित पवार यांच्या अपघाती निधनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने युगेंद्र पवार यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसरातील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना युगेंद्र पवार यांनी अपघात प्रकरणाच्या तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दादांना जाऊन सहा महिने झाले, मात्र चौकशीतून अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. अनेकजण या विषयावर बोलतात; पण प्रत्यक्षात काहीही पुढे सरकत नसल्याचं दिसतं. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे युगेंद्र पवार म्हणाले. अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने अपेक्षित उपाययोजनाही पूर्ण झालेल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला.
साधे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे कामही पूर्ण झालेले नाही. सीआयडी आणि डीजीसीएकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जाते; परंतु अद्याप अंतिम अहवाल समोर आलेला नाही, असे त्यांनी नमूद केले. पुढे त्यांनी सांगितले, ‘कारवाई होत नाही, चौकशीचा निष्कर्षही जाहीर होत नाही. आम्ही सहा महिने संयमाने वाट पाहिली. आता मात्र त्या दिवशी नेमके काय घडले, याचे स्पष्ट उत्तर मिळणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणांनी दुसरा अहवाल तातडीने प्रसिद्ध करावा’, अशी मागणीही युगेंद्र यांनी केली आहे.
सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील आपल्या भावाच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या निधनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दादा, तुझ्यासोबतच्या आठवणी मनात कायम जिवंत आहेत.
















