लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय औषधी विक्रेत्यांच्या देशव्यापी बंदला बुधवारी लातूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लातूर जिल्ह्यातील सर्व औषधी विक्रेत्यांनी आपआपली औषधी दुकाने बंद ठेऊन बंद यशस्वी केला. लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या वेळेत धरणे आंदोलनही करण्यात आले.
ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बुधवार, दि. २० मे रोजी देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार लातूर जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांनी या बंदमध्ये १०० टक्के सहभाग नोंदविला. औषध विक्री व्यवसाय हा औषधे आणि सौंदर्य प्रसाधने अधिनियमांतर्गत चालवला जातो. औषधांची ऑनलाईन विक्री करण्यासंदर्भांत अधिनियमात कोणतीही तरतूद नाही. तरीही केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्रीबाबतची सूचना जारी केली होती. त्या सूचनेचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नसतानाही देशात बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री सुरु आहे.
यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल असून दिल्ली उच्च न्यायालयानेही ऑनलाईन औषध विक्रीस स्थगितीही दिली आहे. असे असतानाही सरकार औषधी विक्रेत्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. सरकारने कोरोनाच्या काळात औषधांच्या होम डिलिव्हरी देण्याबाबत विशेष सूट दिली होती. कोरोना संपूनही बराच काळ उलटला तरी याबाबतची अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही. याचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन औषध विक्री केली जात आहे. यामुळे अनेक छोटे व्यावसायिक – औषध विक्रेते अडचणीत येत आहेत. ग्रामीण भागातील औषधी वितरण व्यवस्था धोक्यात येत आहे. यासंदर्भात शासन – प्रशासनाकडेही वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. तरीही यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ सदर देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. औषधी विक्रेत्यांचा बंद असला तरी अत्यावश्यक औषधींसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये याकरिता ही काळजी घेण्यात आल्याचे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रामदास भोसले यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यातील सर्व औषधी विक्रेत्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रामदास भोसले, सचिव अरुण सोमाणी, उपाध्यक्ष ओमप्रकाश बाहेती, अनिल स्वामी, धनंजय जोशी, सत्यवान सूर्यवंशी, रामकुमार सोनटक्के, सहसचिव प्रकाश साखरे, ईश्वरचंद्र बाहेती, अंकुश भोसले, संगमेश्वर नीला, कोषाध्यक्ष अतुल कोटलवार, रमेश भांगडिया, नाथराव मुंडे, नागेश स्वामी, सौ. दीपाली निनगुरकर, जयप्रकाश रेड्डी, बालाजी थेटे, रमाकांत भुरकापल्ले
आदींनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
















