बीड : ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञाताकडून चपलांचा हार घालण्यात आला आहे. तसेच, गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या नादी लागू नका, अन्यथा राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा देणारे पत्रही गाडीवर लावण्यात आलं आहे. यामुळे आता ऐन निवडणुकीच्या काळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
अशातच आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, असं कोणीच कुणाशी करु नये, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु काहीजण स्वत: अशी कृत्य करतात आणि मराठ्यांवर नाव घालतात. शिवाय ते ही मराठ्यांच्या मागे का लागलेत ? असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर जरांगे पुन्हा आक्रमक लढा उभारणार असल्याचं दिसत आहे. याबाबत त्यांनी स्वत: माहिती देत घोषणा केली आहे. त्यासाठी बीड तालुक्यातील नारायणगडावर मराठा आरक्षणासाठी सर्वात मोठी सभा घेणार असून या सभेसाठीची तयारी सुरु असल्याचं मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितलं. यावेळी माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणाला ज्यांनी पाठिंबा दिला नाही त्यांना पुन्हा एकदा इशारा दिला शिवाय पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रातील सभांवर आणि प्रकाश शेंडगे शाईफेक प्रकरणावरही भाष्य केलं.
माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, या निवडणुकीत मी नाही. पण आता मराठा समाजाने काय करायचं ते ठरवायचं आहे समाजाचा नाईलाज आहे. आम्ही कुणाला पाठिंबा दिलेला नाही. जो सगेसोयरे विषयाच्या बाजूने आहे त्यांचा विचार करा, शिवाय जे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे त्यांना असे पाडा की त्यांच्या दोन-तीन पिढ्या वर येऊ नयेत, असं म्हणत मराठा आरक्षण विरोधकांना जरांगेंनी इशारा दिला.