जिंतूर/प्रतिनिधी
तालुक्यातील कोरवाडी येथे शेतक-याच्या घराला अचानक लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून भस्मसात झाले. ही घटना कोरवाडी येथील गट नंबर २३६ मधील शेतात घडली असून या घटनेमुळे शेतक-याचा संसार उघड्यावर आला आहे.
तालुक्यातील कोरवाडी येथील रामेश्वर हरसिंग राठोड (६७) हे आपल्या पत्नी व मुलासह राहत असून दि.३ रोजी सकाळी ११.३० वा. राठोड यांच्या घराला अचानक आग लागली. शेतात काम करत असताना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या पत्नी, सुन व मुलासह घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला. उन्हाची तीव्रता खूप असल्याने त्यांचे प्रयत्न कमी पडले. अन पाहता पाहता संपूर्ण घर जळून भस्मसात झाले.
या आगीत सोयाबीन, नुकताच शेतातून काढलेला भुईमूग, कपडे, दोन स्प्रिंकलर सेट, नातवांचे शैक्षणिक साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे, अंगावरील घरात ठेवलेल सोन आणि लोखंडाच्या पेटीत ठेवलेली रोख रक्कम जळून खाक झाल्याने राठोड यांचे जवळपासप 3 लाखाचे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे राठोड कुटुंबियांचा संसार उघड्यावर आला आहे. आगीची माहिती मिळताच गावातील सरपंच दिनकर आलाटे यांनी ही माहिती तहसील प्रशासनास फोनद्वारे कळवून सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सदरील घटनेचा पंचनामा तलाठी विकास आगलावे यांनी केला. प्रशासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे. राठोड कुटुंब यांना लागणारे संसार उपयोगी साहित्य मदत स्वरूपात पंचकोशातील नागरिकांनी आपल्या परिस्थितीनुसार मदतीचा हात द्यावा, असे आवाहन कोरवाडी येथिल दिनकर आलाटे यांनी केले आहे.