धाराशिव: राज्याच्या तिस-या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागले असून धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळच झालेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी ही हत्येची घटना घडली आहे. राजकीय वादातून ही हत्या झाल्याची माहिती असून या ठिकाणचे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दोन गटांतील वादाचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले आणि त्यात एकाचा मृत्यू झााल. या हल्ल्यात इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भूम तालुक्यातील पाटसांगवी गावातील जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्राच्या परिसरात हा वाद झाला. मतदान केंद्रावर मतदान आणण्यावरून हा वाद झाला आणि त्यानंतर त्याचं पर्यवसन मोठ्या भांडणात झाले. त्यातून एका गटाने दुस-या गटावर चाकू हल्ला केला. समाधान पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे. तर ज्याने चाकू हल्ला केला त्या आरोपीचे नाव गौरव अप्पा नाईकनवरे असे आहे.
चाकू हल्ला करणारा हल्लेखोर फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. तर या हल्ल्यात इतर तीन जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमधील हा वाद चांगलाच धुमसत होता. आता मतदानाच्या दिवशी त्याचे निमित्त झाले आणि त्यातून ही हत्या झाली.
तालुका रुग्णालयात समाधान पाटीलचा मृतदेह ठेवण्यात आला असून त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे ंिनबाळकर हे भेट देणार असल्याची माहिती आहे.