कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथून एक अत्यंत सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. एका आईने आपल्या दोन चिमुकल्या मुलांना गळफास लावून स्वत:ही आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेत आईसह दोन निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण जयसिंगपूर परिसरावर शोककळा पसरली आहे.
ही धक्कादायक घटना जयसिंगपूर शहरातील मच्छी मार्केट परिसरात घडली. संगीता राजू गाडीवडर (वय २५), मुलगी प्रगती राजू गाडीवडर (वय ४) आणि मुलगा प्रतीक राजू गाडीवडर (वय दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. एकाच घरातील तिघांचे मृतदेह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. आईने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणांमुळे उचलले, हे अद्याप अस्पष्ट असून पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संगीता यांचे काका दत्ता हे सायंकाळी कामावरून घरी परतले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ हाक मारूनही आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने, त्यांनी शेजा-यांच्या मदतीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी प्रगती आणि प्रतीक हे ओढणीच्या साहाय्याने, तर संगीता यांनी साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. या वेळी आरोग्य केंद्राबाहेर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
दुपारी पती-पत्नीमध्ये झाला होता वाद
जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी आईने दोन मुलांना गळफास दिल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी दुपारी पती-पत्नीमध्ये वाद झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या दुर्दैवी घटनेचा पुढील अधिक तपास जयसिंगपूर पोलिस करत आहेत.
















