मुंबई : प्रतिनिधी
जन्म-मृत्यू दाखला काढणा-या नागरिकांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासनाने जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आकारण्यात येणा-या विविध शुल्कांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना ३१ जुलै रोजी जारी करण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
आतापर्यंत जन्म किंवा मृत्यू दाखल्याची प्रत मिळवण्यासाठी १० रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र, नव्या निर्णयानुसार हे शुल्क दुप्पट करून २० रुपये करण्यात आले आहे. अमरावती महापालिकेत सध्या दाखल्यासाठी १० रुपये शुल्क आकारले जात असून, शासनाच्या नव्या निर्णयानंतर लवकरच सुधारित दर लागू होण्याची शक्यता आहे. केवळ नियमित दाखल्याचे शुल्कच वाढलेले नाही, तर विलंबाने नोंदणी करणे, दाखल्याची दुसरी प्रत घेणे, जुन्या नोंदींचा शोध घेणे तसेच नावात दुरुस्ती करण्यासाठी आकारण्यात येणा-या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विविध कारणांसाठी महापालिका किंवा संबंधित कार्यालयात दाखला काढण्यासाठी जाणा-या नागरिकांना पूर्वीपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.
दरम्यान, जन्म-मृत्यूची नोंद वेळेत न झाल्यास त्यासाठीच्या प्रक्रियेतही महत्त्वाचे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. एका वर्षापेक्षा अधिक विलंब झालेल्या नोंदीसाठी उपविभागीय दंडाधिका-यांची परवानगी आवश्यक राहणार आहे. तर दोन वर्षांनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंद करण्यासाठी न्यायालयाचा आदेश घेणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे विलंब झालेल्या नोंदींसाठी नागरिकांना अतिरिक्त कागदपत्रे आणि प्रशासकीय प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
अमरावती शहरात दरवर्षी २५ हजारांहून अधिक जन्म-मृत्यू दाखले जारी केले जातात. त्यामुळे शुल्कवाढीचा परिणाम मोठ्या संख्येने नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. विशेषत: विविध शासकीय योजना, शैक्षणिक कामे, वारसाहक्क, मालमत्ता व्यवहार किंवा इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी जन्म-मृत्यू दाखला आवश्यक असतो. त्यामुळे नव्या शुल्काची अंमलबजावणी कधीपासून होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
















