नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात साईभक्तांच्या फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात झाला असून ३ जणांचा मृत्यू, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरतवरून शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी येत असताना एरंडगाव रायते शिवार परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
हा अपघात एवढा भीषण होता की फॉर्च्युनर गाडीचे पुढील व मागील दोन्ही भाग पूर्णपणे चक्काचूर झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले, तर पोलिसांनी अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
उपचारासाठी नाशिकला नेत असताना एका जखमीने मार्गातच प्राण सोडला. त्यामुळे मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. उर्वरित चार जण नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला हलवण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत करण्यात आली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी वाहनाची तांत्रिक तपासणीही केली जाणार आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे त्या रस्त्यावरील धोकादायक वळणांवर चेतावणी फलक आणि स्पीडब्रेकर्स बसवण्याची मागणी केली आहे.

