नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण भागात जुलैमध्ये सलग पाच दिवस भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. त्यानंतर दि. ५, ६ व ८ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल ४.३ एवढी नोंदविण्यात आली.
तुलनेत यावेळी भूकंपाची तीव्रता आणि विस्तार वाढला असून, जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये हे धक्के जाणवले. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून होणारा भूकंप ‘अर्थक्वेक स्वार्म’ प्रकारातील म्हणजे समूह भूकंप असून, नागरिकांनी घाबरून न जाता, सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शनिवारी (दि. ८) रात्री १० च्या सुमारास नाशिकसह दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, निफाड, बागलाण, चांदवड, देवळा आणि सिन्नर या तालुक्यांना भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भूकंप मालिकेने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दि. २९ जुलैपासून जिल्ह्यात २० धक्के नोंदविण्यात आले.
शनिवारी रात्री जाणवलेला ४.३ रिश्टर स्केलचा धक्का या मालिकेतील सर्वाधिक तीव्र ठरला. यामुळे नाशिक शहरासह दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा आणि चांदवड परिसर हादरला. पेठ तालुक्यातील काही गावांत घरासह मंदिराच्या भिंतींना तडे गेले. शाळेच्या भिंतींची पडझड झाली. भूकंपाची खोली पाच किलोमीटर असून, केंद्रबिंदू २०.४२४ अंश उत्तर अक्षांश आणि ७३.६८२ अंश पूर्व रेखांशावर, सुरगाणा तालुक्याच्या आसपास असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्याचप्रमाणे शहरात उंच इमारतींमध्ये राहणा-या नागरिकांना भूकंपाचे हादरे प्रकर्षाने जाणवले. चांदवड आणि देवळा परिसरात धक्का तुलनेने सौम्य होता. पेठ, दिंडोरी आणि कळवण तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचे हादरे जाणवले. पेठमधील पहुचीबारी जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला भगदाड पडले. जुनोठी येथे मंदिराची भिंत कोसळली. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून उपलब्ध माहितीच्या आधारे परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. अत्याधुनिक भूकंपमापन यंत्रणेमुळे आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
६ ऑगस्टला १२ तासांत सहा धक्के
जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवण्यास दि. २९ जुलैपासून सुरुवात झाली. त्यानंतर सुरगाणा, दिंडोरी आणि लगतच्या परिसरात सातत्याने सौम्य भूकंप नोंदविले गेले. ६ ऑगस्टला अवघ्या १२ तासांमध्ये सहा भूकंपाचे धक्के नोंदविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील भूकंपाच्या हालचालींकडे प्रशासन आणि राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राचे विशेष लक्ष आहे.
















