माजी मंत्री आमदार अमित देशमुख, मराठवाड्यात ३ टक्क्यांपेक्षा कमी वनक्षेत्र, टास्क फोर्सची केली घोषणा
मुंबई/लातूर : प्रतिनिधी
पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर एकूण भूभागाच्या तुलनेत किमान ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. मराठवाड्यात मात्र ३ टक्क्यांपेक्षा कमी वनक्षेत्र आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि कमी पर्जन्यमान पाहता या भागात वनीकरणाची नितांत गरज आहे. पडिक जमिनींचा वापर करून वनीकरण वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करणार का आणि त्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणार का, असा प्रश्न राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्र विधानसभा सभागृहात ९ जुलै रोजी बोलताना माजी मंत्री आमदार देशमुख म्हणाले की, मराठवाड्यातील अनेक शेतक-यांच्या जमिनी पडीक आहेत, तसेच वन विभागाच्याही अनेक जमिनी ओसाड पडून आहेत. या जमिनी भाडेतत्त्वावर घेऊन किंवा इतर पर्यायांचा विचार करून त्याठिकाणी वनीकरण वाढविण्यासाठी वन विभाग प्रयत्न करणार आहे का? तसेच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सरकार एखादा टास्क फोर्स तयार करणार आहे का?
यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, मराठवाड्यासह राज्यातील शासकीय पडिक जमिनींचा उपयोग करून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मराठवाड्यात वनीकरण वाढविण्यासाठी आणि वृक्ष लागवडीची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी निश्चितपणे ‘टास्क फोर्स’ तयार केला जाईल. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचाही सदस्य म्हणून समावेश केला जाईल. वनमंत्र्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण उपाययोजना स्पष्ट केली.
बांबू लागवडीवर भर देणार
बांबू लागवडीवर भर दिला जाणार असून बांबूपासून इथेनॉल निर्मिती करता येते. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि कोकण यांसारख्या भागांतील पडिक जमिनींवर बांबूची लागवड करून वनीकरण वाढवले जाईल, असे सांगितले. वनमंत्री म्हणाले की, या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील पडिक वनजमिनी निवडल्या जातील. या जमिनींना संरक्षक भिंत (कंपाऊंड) उभारून तेथे वृक्ष लागवड केली जाईल, या उपक्रमामुळे पशू-पक्ष्यांचा अधिवास वाढण्याच्या दृष्टीने व्यापक प्रयत्न केले जातील. तसेच तेथे नंतर बांबू लागवड केली जाईल. यामुळे पूरक उत्पन्न मिळेल, असे सांगण्यात आले.
पर्यावरणाचे संतुलन
राखण्यास मदत होणार
पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल. वन विभाग आणि सरकार या दिशेने तातडीने कार्यवाही करेल, असे यावेळी सांगण्यात आले. माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे मराठवाड्यातील ओसाड जमिनींना नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
















