जुलै महिन्याच्या प्रारंभीच मुंबईसह कोकण आणि महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हाहाकार माजवला. हा प्रादेशिक पूरस्थितीचा तडाखा सोडला तर राज्यातील उर्वरित बहुतांश भौगोलिक भागांमध्ये अद्यापही सरासरीपेक्षा अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यातच आता राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या ओसरणार असून ही कोरडी स्थिती किमान १० दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आले होते. परंतु हे चित्र संपूर्ण राज्याचे नाही. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार राज्याच्या अनेक भागांमध्ये, विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही अपेक्षित पावसाची नोंद झालेली नाही.
पावसाचा हा प्रादेशिक असमतोल कायम असतानाच आता मान्सूनचा जोर ओसरल्यामुळे चिंतेत आणखी भर पडणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ८ जुलैपासून मान्सूनचे वारे काहीसे सुस्तावल्याने पावसाचा धुमाकूळ बराचसा थंडावलाआहे. ही स्थिती आता एक-दोन दिवसांपुरती मर्यादित नसून पुढील १० दिवसांपर्यंत राज्यात कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही. केवळ स्थानिक वातावरणामुळे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. परंतु जोरदार पावसाची शक्यता सध्या तरी मावळली आहे. पावसाच्या प्रदीर्घ विश्रांतीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतक-यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हवामानाचा हा बदल लक्षात घेऊन शेतक-यांनी आपल्या शेतीकामांचे नियोजन अत्यंत विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे आवाहन केले आहे. ज्या भागात अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत किंवा पावसाअभावी रखडल्या आहेत, त्यांनी घाईगडबडीत पेरणी न करता जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा. पुढील दहा दिवस ऊन पडण्याची आणि पाऊस उघडण्याची शक्यता असल्याने, शेतक-यांनी या कालावधीचा उपयोग कोळपणी, खुरपणी आणि पिकांना खते देण्यासाठी करावा. जुलै महिन्याच्या प्रारंभी मुंबई महानगर, किनारी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये निसर्गाचे रौद्ररूप पहायला मिळाले. तिथे अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र, या मुसळधार तडाख्यानंतरही संपूर्ण राज्याचा विचार केला असता,
पावसाचे वितरण अत्यंत असमान आणि चिंताजनक राहिले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या प्राथमिक अंदाजानुसार ८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या घटणार असून आगामी किमान १० दिवस सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या हवामान बदलामुळे कोरडवाहू व पावसावर आधारित शेती संकटात सापडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात एका बाजूला पूरस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे अनेक कृषिप्रधान जिल्हे अजूनही एका मोठ्या आणि समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये अद्यापही पेरणीयोग्य, समाधानकारक पाऊस झालेला नाही. मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि सोलापूर या दुष्काळप्रवण पट्ट्यात पावसाने पूर्तता न केल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. पश्चिम विदर्भातील काही जिल्हे आणि संपूर्ण मराठवाड्यातील अनेक भागामध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी नोंदवले गेले आहे. ८ जुलैपासून सुरू झालेला पावसाचा खंड केवळ तात्पुता नसून त्याचे परिणाम दीर्घकालीन राहू शकतात. पावसाच्या अनुपस्थितीमुळे येत्या दहा दिवसांत राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे हवेतील दमटपणा आणि उन्हाचा चटका अधिक जाणवू शकतो. सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे जुलै महिन्याच्या दुस-या पंधरवड्यात देखील पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाची सक्रियता कमीच राहण्याची शक्यता आहे. जुलै महिना शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असल्यामुळे महिन्याच्या उत्तरार्धात होणारी ही पावसाची घट मान्सूनच्या एकूण वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. पावसाच्या या लहरी आणि असमान वितरणामुळे राज्यातील कोरडवाहू शेती क्षेत्राला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. ज्या शेतक-यांनी उपलब्ध ओल पाहून पेरण्या उरकल्या आहेत, त्यांच्या पिकांना आता पुढील १५-२० दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. चुकीच्या वेळी पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते असा इशारा कितीही दिला तरी शेतक-याला दम पडत नाही हेच खरे! थोडी जरी ओल दिसली तरी तो पेरणी करून मोकळा होतो! हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आता पाऊस थोडी विश्रांती घेणार आहे. १६-१७ जुलैपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही. मराठवाड्यात पावसाची तूट मोठ्या प्रमाणावर आहे. अफगाणिस्तानकडून वाहणारे कोरडे वारे गुजरातच्या दिशेने सरकत असून ते कोकण व उर्वरित महाराष्ट्रावर घोंघावणार आहेत. या कोरड्या वा-यांमुळे हवेतील आर्द्रता कमी होईल.
प्रशांत महासागरात तयार झालेल्या ‘एल निनो’चा प्रभाव अधिक तीव्र होत आहे. या दोन्ही घटकांमुळे अरबी समुद्रासह कोकण किनारपट्टी व महाराष्ट्राच्या इतर भागात मान्सूनचे ढग तयार होण्यास बाधा निर्माण झाली आहे. ढगच तयार होणार नसल्याने पावसाची सक्रियता कमी होणार आहे. कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर भागात तुफान पाऊस झाला. नद्या दुथडी भरून वाहिल्या, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. असे असले तरी राज्यातील अनेक धरणांतील पाणीसाठ्याची सध्याची स्थिती चिंताजनक आहे. अमरावती, नागपूर विभाग वगळता अन्य चार विभागातील धरणामधील पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक आणि कोकण विभागाने राज्याची चिंता वाढवली आहे. राज्यात सर्वाधिक धरणे असलेल्या संभाजीनगरमधील धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १४ टक्क्यांनी कमी आहे. मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांसह सोलापूर, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांमध्ये पावसाने हुलकावणी दिली आहे.
















